कोल्हापूर : पाशवी बहुमताच्या बळावर भलेही तुम्ही शेतकऱ्यांच्या विरोधातील कायदे मंजूर कराल, पण लक्षात ठेवा! सध्याच्या युगात बळीला पाताळात गाडणे एवढे सोपे नाही. एक दिवस शेतकऱ्यांची पोरं हातात दगड घेतील त्यावेळी आपल्या काचासुद्धा शिल्लक राहणार नाहीत, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.
वादग्रस्त ठरलेल्या कृषी विधेयकांना काल राज्यसभेत मंजुरी मिळाली. त्यानंतर शेट्टींनी आपली रोखठोक भूमिका मांडली. राज्यसभेमध्ये काल मंजूर झालेला कायदा हा शेतकऱ्यांना कॉर्पोरेट कंपन्यांच्या घशात घालणारा आहे. भलेही तुम्ही कटकारस्थान करून हा कायदा पास केला आहे. मात्र त्याची अंमलबजावणी कशी करणार आहात, हे सुद्धा पहायचे असल्याची प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली आहे.