कोल्हापूर - गावाला रस्ता नसल्याने एका गर्भवती महिलेला उपचाराअभावी आपला जीव गमावाला लागला आहे. ही घटना कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात घडली. भागुबाई राजाराम भुरके असे मृत महिलेचे नाव आहे.
राधानगरी तालुक्यात, म्हासुर्ली पैकी मधला धनगरवाडा नावाचे, कमी लोकवस्ती असलेले गाव आहे. या गावात जाण्यासाठी रस्ताच नाही. याकडे अनेकदा लोकांनी लक्ष वेधलं तरीदेखील प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. या गावात राहणाऱ्या भागुबाई भुरके यांना प्रसूती वेदना सुरू झाल्या. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी तिच्या कुटुंबियांनी धडपड सुरू केली. मात्र मधला धनगरवाडा ते म्हासुर्ली असे 7 किलोमीटर अंतर कसे कापायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. त्यांनी अखेर झोळी करत हे अंतर कापण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा हा प्रयत्न अपयशी ठरला. रुग्णालयात दाखल होण्याआधीच भागुबाई यांनी अखेरचा श्वास घेतला.