कोल्हापूर :राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या वतीने आयोजित संकल्प सभेच्या निमित्ताने कोल्हापूरातील तपोवन मैदानात पार पडलेल्या सभेत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (NCP leader Sharad Pawar) बोलत होते. देशात सध्या वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. केवळ केंद्राच्या यंत्रणांचा वापर सुरू आहे. देशातील सर्वच महत्वाच्या पक्षांनी याबाबत विचार करायला हवा. असे सांगत त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले आणि भाजपवर दोरदार हल्लाबोल केला ( Pawar's Attack on BJP). यावेळी राष्ट्रवादीचे महाराष्ट्रातील सर्वच नेते पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवराय आमच्या हृदयामध्ये:नेहमीच शरद पवार फुले, शाहू,आंबेडकर यांचे नाव घेतात शिवरायांचे का घेत नाही अशी टीका काहीजण करतात. मात्र शिवराय आमच्या हृदयामध्ये आहेत आशा शब्दात त्यांनी टीका करणाऱ्यांना उत्तर दिले. ते म्हणाले, राज्य हे सामान्य माणसांसाठी चालवायचे असते हे शाहू राजांनी, शिवरायांनी दाखवून दिले. त्यांनी केवळ सामान्य माणसांचा विचार केला. त्याच विचारावर चालले पाहिजे. जे फुले, शाहू, आंबेडकर यांचे नाव का घेता हे विचारतात त्यांना महाराष्ट्र कधी समजलाच नाही.
मोदींचा संकुचित विचार देश हिताचा नाही:आज हा देश एकसंघ ठेवण्याचे आव्हान आपल्या सर्वांच्या समोर आहे. काश्मीर फाईल्स बाबत अनेकांना वस्तुस्थिती माहीत नाही. चुकीच्या पद्धतीने दाखविण्यात आले असून चुकीचा संदेश पोहोचविण्याचे काम केले. चंद्रकांत पाटील यांनी हिमालयात जातो असे म्हंटले होते. कोल्हापूरकर हुशार आहात त्यांची अवस्था पाहून त्यांचा चांगला बंदोबस्त तुम्ही केला. कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुक महाराष्ट्राला पुढची दिशा देणारी होती असेही पवार म्हणाले.
आपल्याला गुजरातसाठी निवडलेले नाही: मी अनेक पंतप्रधानांचा काळ पहिला आहे, जगातील अनेक नेते भारतात येऊन गेले ते दिल्ली, मुंबई, हैदराबाद आदी ठिकाणी जायचे. पण अलीकडे वेगळेच चित्र आहे. इतर देशातील राष्ट्राध्यक्ष भारतात येतात आणि गुजरातमध्ये जातात. नुकतेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, चीनचे राष्ट्राध्यक्ष आले ते पण गुजरातला गेले. देशाने आपल्याला देशासाठी निवडले आहे केवळ गुजरात साठी नाही आशा शब्दात मोदींवर निशाणा साधला आणि मोदींचा संकुचित विचार देश हिताचा नाही असेही ते म्हणाले.
ओबीसी आरक्षणाचा निर्णय सर्वांनी स्वीकारायला हवा- अजित पवार :यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, जातिजातीमध्ये दंगा घडविण्याचे काम जे करत होते त्यांना चपराक बसली आहे. महागाईच्या विरोधात लोकं बोलायला नको म्हणून त्यांचे लक्ष वळविण्यासाठी काहीतरी मुद्दे मुद्दाम आणले जातात.ओबीसी समाजाला त्यांच्या संख्येच्या प्रमाणात लोक प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे यासाठी आम्ही जे प्रयत्न केले त्याचा कोर्टाकडून आता निर्णय येणार आहे. जर निर्णय वेगळा आला तर लगेचच आदेशाचे पालन करावे लागेल आणि लगेचच निवडणुका लावाव्या लागतील.
एखादा समाज दुःखी होईल असे बोलू नका - अजित पवार :यावेळी अजित पावर म्हणाले, विरोधकांच्या अजेंडामागे न जाता स्वतःच्या अजेंड्यावर चालले पाहिजे. कोणत्याही माध्यमांना बाईट देताना कार्यकर्त्यांनी सांभाळून बोलावे. एखादे वाक्य बोलून एखादा समाज नाराज होतो. त्यामुळे समाजात काहीही पसरवले जाते. तसे होणे कामा नये असे म्हणत अमोल मिटकरी यांचे नाव न घेता पवार यांनी सबुरीचा सल्ला दिला.
यापुढे राष्ट्रवादी सर्वात मोठा पक्ष असेल - जयंत पाटील :यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, ज्या भूमीत समतेचा संदेश भारताला दिला. ज्या भूमीत बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या व्यक्तीला शाहू महाराजांनी प्रोत्साहन देण्याचे काम केले. त्या भूमीत आम्ही आहोत याची आम्हाला जाणीव आहे. जेंव्हा जेंव्हा शेवटची सभा कागल मध्ये झाली आहे, तेंव्हा तेंव्हा राष्ट्रवादीचा मोठा विजय झाला आहे. येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा सर्वात मोठा पक्ष राष्ट्रवादी असेल.