कोल्हापूर - संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. यावर आळा घालण्यासाठी राज्यात 'ब्रेक द चेन' अंतर्गत नवीन कडक नियमावली लागू करण्यात आली आहे. कोल्हापुरात सकाळपासून नेमकी कोणती दुकान उघडी ठेवायची आणि कोणती नाही याबाबत सर्वत्र गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक व्यवसायिकांनी आपली दुकाने उघडून नियमित पद्धतीनेच आपले व्यवसाय सुरू ठेवल्याचे पाहायला मिळाले. कोल्हापूरसह जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुद्धा हीच परिस्थिती आज (मंगळवार) दिवसभरात होती. कोल्हापुरातल्या कागलमध्ये अनेक व्यापारी आणि दुकानदार संभ्रम अवस्थेत दिसून येत होते.
कोल्हापुरात पहिल्याच दिवशी मिनी लॉकडाऊनचे उल्लंघन नागरिकांना कोणते व्यवसाय बंद आणि कोणते नाही हेच ठाऊक नाही
सरकारनं 'ब्रेक द चेन' अंतर्गत नवीन नियमावली जाहीर केली. यामध्ये वीकेंड लॉकडाऊन सुद्धा जाहीर करण्यात आला. इतर दिवशी सकाळी 7 ते सायंकाळी 8 या वेळेमध्ये जमावबंदी तर रात्री 8 ते सकाळी 7 या वेळेत संचारबंदीचे नियम बनवण्यात आले आहेत. मात्र, प्रत्यक्षात जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने, व्यवसाय बंद ठेवण्याच्या सूचना आहेत. त्यामुळे अजूनही नागरिक संभ्रमात आहेत. शिवाय आम्ही विकेंड लॉकडाऊनला पाठिंबा देतो. मात्र, इतर दिवशी आमचे व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापारी वर्गाकडून होत आहे.
जमावबंदीचे उल्लंघन
राज्यात दिवसभर जमावबंदीसारखा कडक नियम लागू करण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्षात कोल्हापूर शहरासह जिल्ह्याभरात कोणीही जमावबंदीचा आदेश पाळताना पाहायला मिळत नाही. अनेक ठिकाणी नागरिक गर्दी करताना दिसून येत आहेत. काही जणतर मास्कचा वापरही करत नसल्याचे पाहायला मिळत आहे. स्थानिक प्रशासनाकडून नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली जाते. मात्र, कोरोनाला हद्दपार करायचे असेल तर नागरिकांनीही शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.