महाराष्ट्र

maharashtra

जिल्ह्यात राबवणार महसूल लोकयात्रा अभियान; जिल्हाधिकारी दौलत देसाईंची घोषणा

By

Published : Oct 26, 2020, 12:58 PM IST

शासनाच्या विविध विभागात नागरिकांची अनेक कामे प्रदीर्घ काळासाठी प्रलंबित राहिल्याची उदाहरणे अनेकदा समोर आली आहेत. कोल्हापूरच्या महसूल विभागाकडेही खूप कामे प्रलंबित आहेत. ही कामे पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी एका अभियानाची घोषणा केली आहे.

Daulat Desai
दौलत देसाई

कोल्हापूर - जिल्ह्यातील महसूल विभागाकडे जनतेची अनेक कामे प्रलंबित आहेत. ही कामे पूर्ण करण्यासाठी २६ ऑक्टोबर ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत शासनाच्या महास्वराज्य अभियानांतर्गत जिल्ह्यात 'महसूल लोकजत्रा' हे अभियान राबवण्यात येत आहे. हे अभियान पारदर्शकतेने राबवण्यात येत असून जिल्ह्यातील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी महसूल संदर्भातील आपली कामे पूर्ण करून घ्यावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी लोकजत्रा अभियानाची माहिती दिली

महसूल संदर्भातील १५० विषयांचा समावेश -

जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि शेतमजूर यांचा दैनंदिन कामकाजाबाबत आणि विविध प्रश्नांच्या संदर्भात महसूल विभागाच्या प्रत्येक स्तरावरील कार्यालयाशी संबंध येतो. तलाठी कार्यालय, तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला नागरिक कामासाठी सातत्याने भेटी देतात. जनतेची महसूल विषयक कामे पूर्ण करण्यासाठी शासनाकडून प्रत्येक वर्षी महास्वराज्य अभियान राबवले जाते. यातून महसूल विभागातील अनेक कामे पूर्ण केली जातात. यावर्षी उद्भवलेल्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे जिल्ह्यात अनेक कामे रखडली आहेत. त्यामुळे २६ ऑक्टोबर ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत शासनाच्या महास्वराज्य अभियानांतर्गत महसूल लोकजत्रा हे अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानात महसूल संदर्भातील १५० विषयांचा समावेश असणार आहे. जमीन शाखा, महसूल शाखा, कुळकायद्याखालील प्रकरणे, गावठाण शाखा, पुनर्वसन, गौण खनिज शाखा, संगायो शाखा, पुरवठा शाखा, रोजगार हमी योजना, अर्बन लँड सिलिंग आणि कोल्हापूर नागरी समूह, समाज कल्याण विभाग, भूमी अभिलेखा शाखा, सर्वसाधारण शाखा, लेखा परीक्षण शाखा आणि आस्थापना शाखेतील दीडशे विषयांमधील कामे गाव पातळीवर ऑनलाइन पध्दतीने पूर्ण करता येणार आहेत.

अभियानामुळे कमी होणार गर्दी -

या अभियानाचा मुख्य उद्देश हा जिल्ह्यातील जनतेची महसूल विभागातील प्रलंबित कामे पूर्ण करणे आणि प्रशासकीय कामकाजात लोकाभिमुखता जपणे हा आहे. यामुळे महसूलच्या कामासाठी सध्या तहसीलदार कार्यालयात होणारी गर्दी किमान पन्नास टक्क्यांनी कमी करणे शक्य होणार आहे. हे अभियान गाव पातळीवर राबवण्यात येत असून या अभियानात न्याय प्रविष्ट प्रकरणांबाबतची कामे केली जाणार नसल्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी स्पष्ट केले.

ABOUT THE AUTHOR

...view details