कोल्हापूर :जिल्ह्यात गतवर्षी ८ जून रोजी मान्सूनपूर्व पावसाचे आगमन झाले होते. यंदा मात्र 16 जून उजाडला तरीही पावसाने दांडी मारल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. जिल्ह्यामधील प्रमुख धरणातील पाणीसाठा तळाला गेला आहे. परिणामी प्रशासनाने पिण्यासाठी पाणीसाठा राखून ठेवला असल्याने शेतकऱ्यांची पिके करपत आहेत. कोल्हापुरातील इरिगेशन फेडरेशनच्या वतीने आज पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करत जिल्ह्यातील उपसा बंदी मागे घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. जिल्ह्यातून आलेल्या शेतकऱ्यांनी यावेळी पाटबंधारे विभागाच्या तांत्रिक अकार्यक्षमतेमुळे शेतकरी सध्या अडचणीत आला असून पाण्याविना शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत असल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला.
नियोजनाचा अभाव :जिल्ह्यातील प्रमुख धरण असलेल्या कळमवाडी दूधगंगा प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी धरणातील साठ एमसी पाणी कमी करण्यात आले याचा परिणाम म्हणून गेल्यावर्षी याच तारखेला दूधगंगा धरणामध्ये 6.45 टीएमसी इतका असणारा पाणीसाठा आज रोजी अवघा 1.44 टीएमसी इतका उरला आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार शेती पिकांना पाणीपुरवठा केल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवू शकतो यामुळे प्रशासनाने उपसाबंदी लागू केली आहे. मात्र या सर्व गोंधळात पाटबंधारे विभागाचा नियोजन शून्य कारभार पाहायला मिळतो.