महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

...म्हणून शरद पवारांना टार्गेट केले जाते - जयंत पाटील - शरद पवारांची राज्यात सभा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर राज्यभरात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या होत असलेल्या सभांना जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळेच ओबीसी नेत्यांकडून पवारांना लक्ष केलं जात आहे. शरद पवार ओबीसी नेत्यांना टार्गेट करत आहेत, असा गैरसमज पसरवला जात आहे. मात्र, याचा कोणताही परिणाम सभांवर होणार नाही, अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. कोल्हापुरात ते सोमवारी पत्रकारांशी बोलत होते.

Jayant Patil On Sharad Pawar
जयंत पाटील

By

Published : Aug 21, 2023, 10:47 PM IST

Updated : Aug 21, 2023, 10:59 PM IST

शरद पवारांच्या सभेविषयी जयंत पाटलांचे मत

कोल्हापूर:येत्या 25 ऑगस्टला जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आग्रह केल्यानंतरच कोल्हापुरात सभा होत आहे. यापुढे जळगाव आणि पुणे येथे सभा होणार आहेत, कोल्हापुरातील सभेचे अध्यक्षस्थान कोल्हापूरचे शाहू महाराज भूषवणार आहेत; मात्र त्यांच्या लोकसभा उमेदवारीची चर्चा सध्या सुरू आहे. याबाबत विचारले असता, उमेदवारीची चर्चा होत असते. मात्र याबाबत महाविकास आघाडीतील घटक पक्षांची चर्चा करूनच कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराबाबत निर्णय होणार असल्याचे पाटील यावेळी म्हणाले.

पवार साहेब सर्वांचे विठ्ठल:अडचणीच्या काळात ज्येष्ठ नेते शरद पवार यांना सोडून गेलेले आमदार आणि आताचे मंत्रीही शरद पवार यांना विठ्ठल मानतात. पवार साहेबांचा फोटो लावतात, त्यावर आक्षेप घेणे बरोबर नाही. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना पवार साहेबांनी राजकारणात आणलं नसतं तर ते आजपर्यंत या ठिकाणी पोहोचले नसते. मुश्रीफ यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय का घेतला हे तेच सांगू शकतील. याबाबतची सर्व उत्तरे येणाऱ्या 25 ऑगस्टच्या सभेमध्ये सर्वांना मिळतील असेही आमदार जयंत पाटील म्हणाले.

अजित पवार आणि माझ्यात कोणतेच वाद नाहीत:राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माझ्यात कोणतेच वाद नाहीत. आम्ही पवार साहेबांचे कार्यकर्ते आहोत. त्यांच्यासोबत राहिलोय. मात्र काही कारणांमुळे आमच्या वाटा वेगळा झाल्या. याचा अर्थ आमच्यात वाद आहेत असा होत नसल्याचे स्पष्टीकरण प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी दिले.


कोल्हापूर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला:राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे. एक दोन पराभव सोडता या जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला असल्याने 2024 च्या लोकसभा निवडणुकीत ही या जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार असावा अशी अपेक्षा सामान्य कार्यकर्ता करत आहे. एकीकडे मातोश्रीवर झालेल्या बैठकीत कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभेच्या जागेवर भाजपचा विजय होणार नाही, अशी तयारी करा असा कानमंत्र उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. यांच्या शिवसेनेनेही कोल्हापूरच्या जागेवर दावा केला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसनेही या जागेसाठी आग्रह धरला आहे. आता राष्ट्रवादीही कोल्हापूर आपला बालेकिल्ला म्हणत असल्याने जिल्ह्यातील दोन्ही लोकसभेच्या जागांवरून महाविकास आघाडीत नेमका काय निर्णय होतो, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा:

  1. विरोधकांच्या मुंबई बैठकीत सहभागी होणार का? केजरीवालांनी स्पष्टच सांगितले
  2. संजय राऊतांना मनोरुग्णालयात दाखल करण्याची मागणी; भाजपकडून निवेदन
  3. उद्धव ठाकरे, संजय राऊतांना दिलासा; 100 कोटींच्या मानहानी खटल्यात जामीन मंजूर
Last Updated : Aug 21, 2023, 10:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details