कोल्हापूर -नुकतेच माओवादी संघटनेने एक पत्रक काढले होते. त्यामध्ये त्यांनी मराठ्यांनो दलाल नेत्यांपासून सावध व्हा, तुमच्या संघटीत शक्तीला ते राजकारणाकरीता वापरत आहेत, असे म्हटले होते. त्यांच्या या पत्रकानंतर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही पत्रक काढून सर्वच नक्षलवादी संघटनांना लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात येण्याबाबत आवाहन केले होते. याबाबत विचारले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विचारले असता, सर्वच नक्षलवादी संघटनांना यापूर्वीच्या सर्वच राज्यकर्त्यांनी मुख्य प्रवाहात सामील होण्यास आवाहन केले होते, अशी प्रतिक्रिया दिली. आजपर्यंत जेवढेही राज्यकर्ते झाले आहेत, त्या सर्वांनीच नक्षलवाद्यांना मुख्यप्रवाहात येण्याचे आवाहन केले आहे. शिवाय सर्वच नक्षलवाद्यांनी देशाचे एक जबाबदार नागरिक म्हणून समोर यावे, असेही त्यांनी यावेळी म्हटले.
संभाजीराजेंनी आपल्या पत्रात काय म्हटले -
काल रविवारी संभाजीराजेंनी नक्षलवादी संघटनांना आवाहन करणाऱ्या पत्रकात म्हटले होते की, 'छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची साक्ष देऊन मराठा समाजाला भुरळ पाडण्याचा प्रयत्न नक्षलवादी संघटना करत असल्याचे मला वाचनात आले. 'मराठ्यांनो, आम्ही तुमची वाट पाहत आहोत' असेही ते म्हणाले. उलट मराठा समाजाचा घटक किंवा त्याच स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज या नात्याने, मी त्यांनाच आवाहन करतो. नक्षलवाद्यांनो या आम्हीच तुमची वाट पाहत आहोत. या सामील व्हा मुख्य प्रवाहात. भारताने लोकशाही व्यवस्था स्वीकारली आहे.' तसेच 'कुठलीच व्यवस्था परिपूर्ण नसते, तिच्यात उणीवा असणारच. लोकशाहीबाबत पण काहींचे वेगळे मत असू शकतात. परंतु जगभरात आज ती व्यवस्था स्वीकारली गेली आहे. भारताने सुद्धा तिचा यशस्वी स्वीकार केला, यशस्वी वाटचाल सुद्धा करत आलो आहोत. काही उणीवा आजही असतील, पण आपण त्यामध्ये सुधार करण्यासाठी प्रयत्न करायचे असतात. क्रांतीचा विचार हा चांगलाच आहे. पण तो विधायक मार्गाने जाणारा असावा. तो विधायक मार्गाने सुद्धा घेऊन जाता येतो. काही लोक या लोकशाही व्यवस्थेत चांगले नसतीलही, पण म्हणून संपूर्ण व्यवस्थाच कुचकामी आहे, असे नसते. लोकांना शिक्षित करून, चांगल्या वाईट गोष्टींची जाणीव करून देऊन मत पेटीच्या साहाय्याने पर्याय उभा करून देण्यातच संपूर्ण राष्ट्राची भलाई आहे.' असेही म्हणत त्यांनी सर्वच नक्षलवादी संघटनांना आवाहन केले होते.
हेही वाचा - कॉंग्रेस हायकमांडने जबाबदारी दिली, तर मुख्यमंत्रीही होईन - नाना पटोले