महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'सखी'च्या माध्यमातून जालन्यातील सख्यांनी सुरू केली जलपुनर्भरणाची चळवळ

सखी ग्रुप ऑफ जालना या ग्रुपच्या कामातून प्रोत्साहित होऊन शहरात जलपुनर्भरणाचे 10 उपक्रम पूर्ण झाले आहेत.जलपुनर्भरणाची 10 ठिकाणी कामे सुरु असून जलपुनर्भरणाचा उपक्रम 150 घरांमध्ये राबविण्यासाठी ग्रुप प्रयत्नशील आहे.

By

Published : Jul 5, 2019, 11:53 AM IST

सखी ग्रुप ऑफ जालनाच्या सदस्या

जालना- दिवसेंदिवस वाढत चाललेली पाणीटंचाई लक्षात घेता जलपुनर्भरणाची गरज ओळखून "सखी ग्रुप ऑफ जालना" हा साठ सख्यांच्या ग्रुप शहरातील अनेक भागांमध्ये फिरून त्यांच्या इतर सख्यांना जलपुनर्भरणासाठी प्रोत्साहित करत आहे. जालन्यातील महिलांच्या ग्रुपच्या माध्यमातून जलपुनर्भरणाविषयी फक्त जनजागृतीच नव्हे तर प्रत्यक्षात हा उपक्रम पूर्ण करून घेण्याचे काम सुरू आहे. चालू महिन्यामध्ये जलपुनर्भरणाचे 10 उपक्रम पूर्ण झाले असून आणखी दहा उपक्रम प्रगतीपथावर असल्याची माहिती या ग्रुपच्या सदस्यांनी दिली.

दिलीप पोहनेकर

गेल्या महिनाभरापासून या ग्रुपमधील साठ महिलांनी शहराच्या विविध भागात जाऊन जलपुनर्भरणाबाबत जनजागृती केली. फक्त जनजागृतीच केली नाही तर,आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे ग्रुपमधील महिलांनी स्वत:च्या घरी हा उपक्रम राबविला आणि मग इतरांना सांगितला. त्यामुळे दुसऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी स्वतः केलेल्या कामाची त्यांना मदत झाली. सध्या त्यांच्या या कामापासून प्रोत्साहित होऊन शहरामध्ये 20 कामे सुरू आहेत. शिवाजी पुतळा भागात असलेल्या डॉ.राजेंद्र करावा यांच्या हॉस्पिटलमध्ये सध्या उपक्रमाचे काम सुरू आहे. तसेच अन्य ठिकाणी देखील हे काम प्रगतीपथावर आहे.

किमान दीडशे घरांनी जरी जलपुनर्भरणाचा उपक्रम राबविला तरीदेखील आम्ही केलेल्या प्रयत्नाला यश आले असे समजून आमचे समाधान होईल,असे मतही या सखी ग्रुपच्या सदस्यांनी व्यक्त केले. जलपुनर्भरण उपक्रमांतर्गत सुरू असलेल्या कामांबद्दल तसेच जनजागृती साठी केलेल्या कामाची माहिती एकत्रित करण्यासाठी या महिलांची नुकतीच "हार्वेस्टिंग पे चर्चा" झाली.यावेळी ग्रुपच्या अध्यक्ष सौ. उर्मिला करावा, प्रकल्पप्रमुख सौ. निर्मला साबू, सौ. निर्मला लड्डा यांच्यासह सह कोषाध्यक्ष सौ.परवीन आनंद, सचिव सौ. साधना करावा, सल्लागार सौ. राजलक्ष्मी नानावटी आदींची उपस्थिती होती.

*हे आहे या ग्रुपच्या कामाचे स्वरूप*
ग्रुप मधील महिला रोजच्या घर कामातून वेळ काढून एकत्र येऊन शहरातील विविध भागात जाऊन तेथील घरच्या महिलांना भेटतात. हा उपक्रम महिलांना समजून सांगितल्यानंतर त्या घरातील कर्त्या पुरुषाला चांगल्या प्रकारे समजून सांगू शकतात आणि त्यांच्याकडून हा उपक्रम करून घेऊ शकतात. त्यामुळे महिलांना प्रोत्साहित करण्यावर सखी ग्रुप जास्त भर देत आहे. उपक्रमासाठी विविध साहित्य जमा करताना, मजूरांची उपलब्धता या अडचणीमुळे नागरिक हे जलपुनर्भरण करण्यासाठी धजावत नाहीत. मात्र,या कामासाठी लागणारे साहित्य, मजुर ते सर्व काम पूर्ण होईपर्यंत लागणारी मदत एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिले जाते. यामुळे अनेक जण प्रोत्साहित होत असल्याचेही या ग्रुपच्या सदस्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details