महाराष्ट्र

maharashtra

बदनापूरमध्ये दुष्काळाच्या झळा... नागरिकांची पायपीट करून पाण्यासाठी वणवण

बदनापूर तालुक्यातील विविध गावात पाणी पुरवठा करणाऱ्या नळ योजनांना पंधरा ते वीस दिवसाला एक वेळा पाणी पुरवठा होत असून, तालुक्यात जवळपास 12 ते 17 गावे भीषण पाणीटंचाईला तोंड देत आहेत.

By

Published : May 14, 2020, 6:53 PM IST

Published : May 14, 2020, 6:53 PM IST

Water shortage in badnapur
बदनापूरमध्ये दुष्काळाच्या झळा...नागरिकांची पायपीट करून पाण्यासाठी वणवण

जालना - बदनापूर तालुक्यातील विविध गावात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईच्या झळा बसत असून, ग्रामीण भागातील महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी मोठया प्रमाणात पायपीट चाललेली असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनही या पाणी टंचाईकडे लक्ष देत नसल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ येत आहे.

बदनापूरमध्ये दुष्काळाच्या झळा...नागरिकांची पायपीट करून पाण्यासाठी वणवण

तालुक्यातील विविध गावात पाणी पुरवठा करणाऱ्या नळ योजनांना पंधरा ते वीस दिवसाला एक वेळा पाणी पुरवठा होत असून, तालुक्यात जवळपास 12 ते 17 गावे भीषण पाणीटंचाईला तोंड देत आहेत. असे असले तरिही पाणीटंचाईवर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी प्रशासन, सामाजिक संस्था अथवा लोकप्रतिनिधींकडून सध्यातरी कोणतेही पाऊल उचलले जात नसल्याचे चित्र आहे. पाण्याचे टँकर आणि विहीर, बोअर अधिग्रहणाची मागणी मोठ्या प्रमाणात प्रशासनाकडे होत आहे. त्यामुळे कोरोनामुळे हैराण असलेला सर्वसामान्य नागरिक पाण्यासाठी ही होरपळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

बदनापूर तालुक्यांमध्ये दरवर्षी होणाऱ्या पावसाचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे दरवर्षी उन्हाळयात भिषण पाणी टंचाई असते यंदा मात्र ऑक्टोबर नोव्हेंबर 2019 मध्ये झालेल्या परतीच्या पावसाने एप्रिल महिन्यांपर्यत पाणी पुरवठा करण्याजोगी पाणी होते. मात्र त्यानंतर मात्र तालुक्यातील ग्रामीण भागातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर होत चाललेला दिसून येत आहे. तालुक्यातील पाणी पुरवठा करणाऱ्या जवळपास सर्व तलाव, विहिरी या सद्यस्थितीत कोरड्या पडल्या आहेत.

प्रत्येक वर्ष-दोन वर्षांनी अशी दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाई निर्माण होणार नाही, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना होणे गरजेचे आहे. परंतु सततच्या दुष्काळाकडे आणि होत असलेल्या कमी पर्जन्यमान याकडे साऱ्यांचेच दुर्लक्ष होत आहे. पावसाळा आला की, वृक्ष लागवडीचे कागदोपत्री उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रशासनाची धावपळ असते. परंतु लावण्यात आलेली रोपे किती जगली, याकडे कुणीही पाहात नाही.पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरविण्यासाठी कुठल्याही लोकप्रतिनिधींकडून सामाजिक संस्थांकडून किंवा प्रशासनाकडून म्हणावे तसे प्रयत्न होताना दिसून येत नाहीत.

तालुक्यातील अनेक गावांत भीषण पाणीटंचाईचा सामना करत असताना भविष्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी गावपातळीवरील लोकप्रतिनिधी, शासकीय कर्मचारी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जलपुनर्भरण, वृक्षलागवड, जलयुक्त अभियान हे प्रभावीपणे राबविणे गरजेचे आहे. परंतु हे सर्व उपक्रम उत्सव साजरा केल्याप्रमाणेच राबविले जातात. भविष्यात दुष्काळ व पाणीटंचाई निर्माण होणार नाही, यासाठी सर्वांनी गांभीर्याने याची दखल घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे. तालुक्यातील रोषणगाव येथेही पाणी टंचाईच्या झळा सामान्य नागरिकांना बसत असून पहाटेापासून गावाबाहेरील विहिरीवर महिला पाणी भरण्यासाठी गर्दी करत असल्याचे चित्र आहे.

पशुपक्षी पाण्याच्या शोधात...

बदनापूर तालुक्यातील अनेक विहिरी, तलाव या कोरड्या पडल्या आहेत. परिसरातील सर्वच जलस्त्रोत पूर्णपणे आटल्याने तालुक्यात खादगाव येथे असलेल्या संरक्ष्ज्ञीत वनातील अनेक पक्षी, प्राणी हे पाण्याच्या शोधात गावाजवळ भटकत असतानाचे चित्र पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. या तीव्र उष्णतेमुळे माणसांबरोबरच मुकी जनावरे, प्राणी-पक्षी यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. खादगाव येथे जवळपास 400 ते 500 एकर जमीन ही वनक्षेत्रात मोडत असून या ठिकाणी मोठया संख्येने हरीण, वानरे, माकड, कोल्हे, लांडगे, हरीण, ससे आदी प्राण्यांचे वास्तव्य आहे. पण या प्राण्यांनाही पाण्याच्या शोधात इकडे तिकडे फिरताना दिसून येत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details