महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नगरपालिकेचे वरातीमागून घोडे; वारकऱ्यांना माराव्या लागल्या चिखलातून उड्या

जालन्याचे प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणार्‍या आनंदी स्वामी महाराजांच्या पालखी दरम्यान रस्त्यात ठिकठिकाणी खड्डे होते. मात्र, पालखी मार्गावरील हे खड्डे मुरमाऐवजी मातीने बुजविण्यात आले. तेव्हा हे खड्डे नागरिकांच्या लक्षात आले नाहीत. मात्र, आज संत श्रेष्ठ गजानन महाराजांची पालखी जालन्यात आली आणि नगरपालिकेचा भोंगळ कारभार नागरिकांच्या दृष्टीस पडला.

By

Published : Jul 27, 2019, 7:41 PM IST

वारकऱ्यांना माराव्या लागल्या चिखलातून उड्या

जालना- नगरपालिकेचा कारभार दिवसेंदिवस ढेपाळत चालला आहे. आज संत श्रेष्ठ गजानन महाराजांची पालखी जालन्यात आल्याने पुन्हा एकदा नगरपालिकेचा भोंगळ कारभार समोर आला.

वारकऱ्यांना माराव्या लागल्या चिखलातून उड्या

मागच्या महिन्यात झालेल्या आषाढी एकादशीनिमित्त जालन्याचे प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणार्‍या आनंदी स्वामी महाराजांच्या पालखी दरम्यान रस्त्यात ठिकठिकाणी खड्डे होते. मात्र, पालखीच्या आदल्या दिवशीच वरिष्ठ नेत्यांनी आणि अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन हे खड्डे काही प्रमाणात बुजविले. त्यावेळी पाऊस न पडल्याने मुरमाऐवजी मातीने बुजविलेले खड्डे नागरिकांच्या लक्षात आले नाहीत. मात्र, आज संत श्रेष्ठ गजानन महाराजांची पालखी जालन्यात आली आणि नगरपालिकेचा भोंगळ कारभार नागरिकांच्या दृष्टीस पडला. त्यामुळे सर्वत्र पालिकेच्या या नियोजनाबद्दल संताप व्यक्त होत आहे.

शहरात ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचले आहे. या साचलेल्या पाण्यामुळे रस्त्यावर खड्डे पडले आहेत. परंतु, आज पालखी येण्याच्या निमित्ताने हे खड्डे बुजविले जातील, अशी अपेक्षा सर्वांनाच होती. परंतु नगरपालिकेने नेहमीप्रमाणे नागरिकांच्या या अपेक्षेला पाने पुसली. 'तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो' अशा पद्धतीने साचलेल्या पाण्यामध्ये मुरूम न टाकता माती टाकली आणि त्यामुळे आणखीनच चिखल झाला.

गजानन महाराजांच्या पालखीसोबत असलेल्या वारकऱ्यांची शिस्त पाहण्यासाठी, त्यांच्या पावल्या पाहण्यासाठी भाविक वर्षभर वाट पाहतात. परंतु, पालिकेच्या या दुर्लक्षामुळे नागरिकांची नाराजी झाली आहे. रस्त्यात टाकलेल्या मातीमुळे चिखल झाला आणि शिस्तबद्ध पद्धतीने चालणाऱ्या वारकऱ्यांना ही शिस्त मोडावी लागली. अर्धवट बुजलेल्या या खड्ड्यांमुळे गजानन महाराजांच्या पालखीलादेखील या चिखलातूनच वाट काढावी लागली. पालिकेच्या या ढिसाळ कारभारावर जनता मात्र संताप व्यक्त करीत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details