जालना- बदनापूर नगरपंचायतीच्या वतीने 'घरी साठवा, शाळेत पाठवा' पाठवा हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाबाबत प्रत्येक शाळेत जावून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. हा अभिनव उपक्रम त्यांनी सुरू केला आहे.
बदनापूर नगरपंचायतीकडून गेल्या वर्षभरात 9 व्यापाऱ्यांवर कारवाई करून 120 किलो प्लास्टिक जप्त करून 30 हजार रुपयांचा दंड नगरपंचायतीने वसूल केला आहे. मात्र, तरीदेखील प्लास्टिक बंदीवर परिणाम झाला नाही. त्यामुळे हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना प्लास्टिकमुळे होणारे दुष्परिणाम आणि त्याचा पशुपक्ष्यांवर होणारा परिणाम याविषयी माहिती देण्यात येते.
बदनापूर नगरपंचायतीचा अभिनव उपक्रम हेही वाचा - खदानीमध्ये पोहायला गेलेल्या तरुणाचा हात अडकल्याने पाण्यात बुडून मृत्यू
नगरपंचायतची एका ठराविक दिवशी प्रत्येक शाळेमध्ये घंटागाडी येते. त्या दिवशी महिनाभर घरांमध्ये साठवून ठेवलेला आणि नष्ट न होणारा प्लास्टिकचा कचरा हा शाळेत आणून जमा केला जातो. घरामधील विघटन न होणारे प्लास्टिक विद्यार्थी शाळेमध्ये आणून देतात. त्यामुळे गेल्या 4 महिन्यांपासून सुरू झालेल्या या उपक्रमांमध्ये 500 क्विंटल प्लास्टिक जमा झाले आहे. या प्लास्टिकचा पुनर्वापर करण्यासाठी नगर जवळील कारखान्यात पाठवण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे यांनी दिली आहे.
हे प्लास्टिक विकून जे पैसे मिळतील, ते या उपक्रमावर खर्च केले जाणार आहेत. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी घरी साठवून ठेवलेले प्लास्टिक शाळेत आणून जमा केले. अशा विद्यार्थ्यांचा बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक खेडेकर यांच्या हस्ते शालेय वस्तू भेट देऊन सत्कार करण्यात आला. सर्वात जास्त कचरा आनणाऱ्या सयद या विद्यार्थ्याचा विशेष सत्कार करण्यात आला.
हा उपक्रम राबवण्यासाठी नगरपंचायतीच्या वतीने मुख्याधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे, शहर अभियंता गणेश ठुबे, शहर समन्वयक अंजली हिवाळे, ज्ञानेश्वर रेवगडे, गणेश सुरवसे, भरत पवार यांनी सहभाग घेतला.
हेही वाचा -तिसरीत शिकणाऱ्या मुलीचा पाय घसरून पडल्याने मृत्यू; सहलीला जाण्याची सुरू होती तयारी