जालना - जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांची हेळसांड होत आहे. रुग्णालयाबाहेरच्या रस्त्यांची अवस्थाही बिकट आहे. याविषयी ईटीव्ही भारतने 16 जानेवारीला 'सामान्यांच्या रुग्णालयात नेत्यांसाठी पायघड्या; मात्र रुग्णांसाठी मरणयातना' या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती.
या बातमीची दखल जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतली आहे. मागील तीन वर्षांपासून निधी देऊनही काम का झाले नाही, याची चौकशी करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. या प्रकरणात लक्ष घालून रस्त्याचे आणि रुग्णालयाचे प्रश्न येत्या दीड महिन्यात सोडवले जातील, अशी माहिती टोपे यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या जिल्हा नियोजन व विशेष समितीच्या बैठकीनंतर ते बोलत होते.
हेही वाचा - 'घरात साठवा, शाळेत पाठवा' बदनापूर नगरपंचायतीचा अभिनव उपक्रम
जिल्ह्यामध्ये आणि विशेष करून जालना शहरामध्ये भाजपच्या काळात सिमेंटचे रस्ते झाले होते. या कामाच्या दर्जाबाबत सुरुवातीपासून अनेक तक्रारी आल्या होत्या. या संदर्भात तत्कालीन पालकमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्याकडेही वारंवार तक्रारी केल्या होत्या. मात्र, कंत्राटदार भाजपचे, सरकारही भाजपचे आणि मंत्रीही भाजपचे असा त्रिवेणी संगम असल्यामुळे 'चौकशी सुरू आहे' या आश्वासनाच्या पुढे काहीच उत्तर मिळाले नाही.
आता भाजपचे विरोधक मंत्री राजेश टोपे यांनी पालक मंत्री पदाचा पदभार स्वीकारला. त्यांनी भाजपच्या काळात झालेल्या कामांची चौकशी करण्याचे सूतोवाच केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जालना शहरात झालेल्या सिमेंटच्या रस्त्यांची थर्ड पार्टीकडून चौकशी करून घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यासाठी जिल्हा नियोजन व विकास समिती आर्थिक तरतूद करेल, त्यानंतरच संबंधित विभागाची थकलेली देयके दिले जातील असेही टोपे म्हणाले.
जिल्हा नियोजन व विशेष समितीच्या बैठकीनंतर बोलताना राजेश टोपे त्यामुळे जालना शहरातील सिमेंटच्या रस्त्यांचा दर्जाही तपासला जाण्याची शक्यता आहे. एकंदरीत भाजपाने केलेल्या विकास कामांचे ऑडिट करण्याचे कामच पालकमंत्री राजेश टोपे हाती घेतील, अशी शक्यता नाकारता येत नाही.