जालना - शासकीय कर्मचाऱ्यांनी फक्त परिवाराचा विचार करू नये आणि केवळ पगारासाठी नोकरी करू नये. नोकरी ही जनतेचे कामे करण्यासाठी आहे, हे लक्षात ठेवावे आणि त्या पद्धतीने काम करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी केले.
पोस्टाच्यावतीने डाक मेळाव्याचे आज(शुक्रवार) आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुकन्या समृद्धी योजनेसंदर्भात पोस्टाने पूर्ण केलेल्या उद्दिष्ट संदर्भात त्या बोलत होत्या. अरोरा म्हणाल्या सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ फक्त ७०० मुलींना मिळाला याने उद्दिष्ट पूर्ण झाले असे म्हणता येणार नाही. हे उद्दिष्ट लाखांमध्ये असायला पाहिजे. मात्र, शासकीय कर्मचाऱ्यांच्या उदासीनतेमुळे ही योजना मागे पडली आहे. परंतु, पोस्टाने शिक्षण विभागासोबत पाठपुरावा करून काम केले तर जिल्ह्यातील सर्व शाळांमधून मुलींसाठी असलेली ही सुकन्या समृद्धी योजना आपण राबवू, असे आश्वासन त्यांनी दिले.