महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परदेशातून आलेल्या तरुणांचे भर वस्तीतील हॉटेलमध्ये विलगीकरण; नागरिकांमध्ये घबराट - jalna corona update

परिसरातील नागरिकांनी हॉटेलचे विलगीकरण केंद्र तयार केल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे. भर वस्तीतील हे केंद्र बंद करावे, परिसरातील नागरिकांच्या आरोग्यासोबत होत असलेला खेळ थांबवावा, अशी मागणी या कॉलनीत राहणाऱ्या नागरिकांनी केली आहे.

जालना
जालना

By

Published : May 14, 2020, 5:54 PM IST

जालना - परदेशातून आलेल्या तरुणांचे जालना शहरातील भरवस्तीत असलेल्या हॉटेल बगडिया इंटरनॅशनलमध्ये विलगीकरण करण्यात आल्यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे धाबे दणाणले आहेत. विशेष म्हणजे या हॉटेलमध्ये सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत, त्यामुळे विलगीकरण करण्यात आलेल्या नागरिकांना येथे ठेवावे आणि त्यांचे होणारे बिल वसूल करावे, असा आदेश जिल्हा प्रशासनाने दिला आहे. मात्र, परिसरातील नागरिकांनी या हॉटेलचे विलगीकरण केंद्र तयार केल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे. भर वस्तीतील हे केंद्र बंद करावे, परिसरातील नागरिकांच्या आरोग्यासोबत होत असलेला खेळ थांबवावा, अशी मागणी या कॉलनीत राहणाऱ्या नागरिकांनी केली आहे.

बाईट - पोलीस निरीक्षक संजय देशमुख

जालना शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या संभाजी नगर, मनिषनगर, म्हाडा वसाहत, श्रीकृष्णनगर या वसाहतींच्या मध्यवर्ती भागात हे हॉटेल आहे. हा पूर्णपणे रहिवासी परिसर आहे. असे असतानाही प्रशासनाने या हॉटेलमध्ये काही लोकांना विलगीकरणात ठेवले आहे. खरेतर या लोकांची घरे एवढी मोठी आहेत की, ते स्वतःच्या घरात देखील विलगीकरणात राहू शकतात. मात्र, उच्चभ्रू घरातील हे तरुण असल्यामुळे आणि हॉटेलमधील सोयी-सुविधांचा उपभोग घेतल्यानंतर देय होणारे बिलही देऊ शकत असल्याने प्रशासनाने त्यांना या ठिकाणी ठेवले आहे. काल दिनांक 13 मे रोजी तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी बगडिया इंटरनॅशनल हॉटेलला पत्र देऊन हे हॉटेल उपलब्ध करून देण्यासाठी आदेश दिले आहेत.

या आदेशात म्हटले आहे, की आंतरराष्ट्रीय स्तरावरून विमानाद्वारे जालना जिल्ह्यात दाखल होणाऱ्या प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करून विलगीकरणात स्वखर्चाने राहण्यासाठी हॉटेलमध्ये व्यवस्था करण्यात यावी, तसेच त्यांना लागणाऱ्या अत्यावश्यक सोयी-सुविधा जसे जेवण, पाणी, साफसफाई इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात.

त्यामुळे प्रवाशांकडूनच रक्कम घेऊन विलगीकरण करायचे होते, तर शहराबाहेरील हॉटेलमध्ये का केले नाही? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. शासनाला मदत म्हणून हॉटेल व्यवस्थापनाने विनामूल्य हॉटेल उपलब्ध करून दिले असते, तर नागरिकांनी समजून घेतले असते. मात्र, प्रशासनाला हाताशी धरून येथे व्यवसाय सुरू आहे आणि नागरिकांचे जीव धोक्यात टाकले जात आहेत, असा आरोप नागरिकांनी केला आहे.

तक्रारीत जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनावर भास्कर दानवे, तुळजेश चौधरी, सुंदर डेमडा, तेजराम परमार, राजेश भंडारी, योगेश ठक्कर आदी नागरिकांच्या सह्या आहेत. दरम्यान, यासंदर्भात सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्याशी संपर्क साधल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार हे हॉटेल ताब्यात घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details