जालना -कोरोनाबाधित रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी शासनाने ठरवून दिलेल्या रुग्णालयातच भरती व्हावे, असे आवाहन या आरोग्य योजनेचे विभागीय व्यवस्थापक फणींद्र चंद्रा यांनी केले. गुरुवारी त्यांनी जालना जिल्ह्यातील महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा आढावा घेतला.
अपुऱ्या माहितीमुळे गैरसमज -
महात्मा फुले जनआरोग्य योजना ही एक विमा कंपनीसारखे काम करते. त्यामुळे शासनाने ठरवून दिलेल्या रुग्णालयालाच ही योजना लागू आहे. मात्र, काही रुग्ण हे त्या रुग्णालयात न जाता दुसऱ्या ठिकाणी उपचार घेत आहेत आणि झालेल्या खर्चाचा परतावा मागत आहेत. अशा परिस्थितीत त्यांना हा परतावा देणे शक्य नाही आणि त्यामधून गैरसमज वाढत आहेत. तसेच रुग्णालयात भरती झाल्यानंतरही त्या रुग्णाच्या ऑक्सिजनचे प्रमाण तपासूनच त्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे रुग्णांनी शासनाने ठरवून दिलेल्या रुग्णालयात उपचार घ्यावेत जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ मिळेल, असे आवाहनही चंद्रा यांनी केले आहे.
आगाऊची रक्कम परत मिळणार -
शासनाच्या यादीवर असलेल्या आणि कोरोना बाधित रुग्णाकडून जास्त रक्कम उकळलेल्या हॉस्पिटलची तक्रार महात्मा फुले जन आरोग्य योजना इकडे आल्यानंतर त्याची पूर्ण चौकशी करून अधिकची वसूल केलेली रक्कम रुग्णाला परत देण्यात येईल असे ते म्हणाले. अशा प्रकारच्या 54 तक्रारी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याकडे आलेल्या आहेत. त्या सर्व प्रकरणाची चौकशी केल्या जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.