जालना- ओबीसी समाजाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र या मोर्चाला परवानगीबाबत प्रशासनाकडून दिशाभूल करण्यात येत आहे. आजचा मोर्चा पूर्व नियोजित असला तरीही प्रशासनाकडून अद्याप परवानागी दिल्याचे अथवा नाकारल्याचे अद्याप स्पष्ट करण्यात आले नसल्याने आंदोलकामध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
दोन महिन्यांपासून तयारी
गेल्या दोन महिन्यांपासून ओबीसी मोर्चाची तयारी चालू आहे. या मोर्चाला डझनभर मंत्र्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. मात्र मोर्चाला परवानगी आहे किंवा नाही? या प्रश्नासंदर्भात अद्यापपर्यंत अधिकृत कोणीही बोलायला तयार नाही. ओबीसी मोर्चाचे पदाधिकारी म्हणतात परवानगी आहे. परंतु कागद दाखवायला तयार नाहीत, आज सकाळी दहा वाजेपर्यंत या मोर्चाला परवानगी देण्यात आली नव्हती. तसेच जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनीदेखील दोन दिवसापूर्वीच पोलीस आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून त्याविषयी निर्णय घेतला जाईल,असे स्पष्टीकरण दिले होते. मात्र आज मोर्चाचा दिवस उजडला तरी परवानगीबाबत अद्याप स्पष्टता नाही.