बदनापूर (जालना) - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊन व जमावबंदीचा फटका शेतकऱ्यांनाही बसत आहे. पीक कर्ज मंजुरीसाठी बँकेत चकरा माराव्या लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर बँक ऑफ महाराष्ट्र, बदनापूर शाखेच्या वतीने थेट गावात जाऊन गावातील जवळपास 150 शेतकऱ्यांचे पीक कर्जाचे अर्ज भरून घेऊन एक नवा उपक्रम राबवला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र सुरक्षित अंतर राखण्याचे आदेश असून सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ न देण्याच्या सूचना केलेल्या आहेत. त्या अनुषंगाने बँकेच्या शाखेतही गर्दी होऊ न देण्याचे निर्देश आहेत. पावसाळ्याच्या तोंडावर कर्जमुक्त झालेले शेतकरी तसेच नवीन पीक कर्ज मागणाऱ्या शेतकऱ्यांची गर्दी बँकेसमोर होऊ लागली होती. त्यामुळे सुरक्षित अंतराचे पालन होत नसल्यामुळे बदनापूर येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा व्यवस्थापक चेतन वानखेडे यांनी या शेतकऱ्यांना थेट गावातच सेवा देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी तालुक्यातील धोपटेश्वर येथील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी थेट गावात जाऊन पीक कर्जाबाबतचे अर्ज व इतर कागदपत्रे घेण्याचा निर्णय घेतला.