जालना -अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटलेली ५० वर्षीय महिला चंदंनजिरा पोलिसांनी सापडली. त्यानंतर पोलिसांनी रात्री दीड वाजता या महिलेला सुखरूप तिच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञातांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशी घडली घटना
ही महिला लग्न समारंभामध्ये आचाराच्या हाताखाली पोळ्या करण्याचे काम करते. असा एक कार्यक्रम आटोपून काल सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास नवीन मोंढा ते राजूर चौफुली या रस्त्यावरून ती जात होती. या वेळी पाठीमागून आलेल्या एका चारचाकी वाहनातील अज्ञातांनी या महिलेला बळजबरीने वाहनात बसवले आणि एक तास फिरत राहिल्यानंतर रेल्वे पटरी जवळ आणले. येथे अज्ञात व्यक्ती दारू पीत असल्याचा फायदा घेत महिलेने वाहनातून धूम ठोकली. अज्ञातांनी महिलेचा खूप शोध घेतला, मात्र ती मिळाली नाही. महिला सुमारे एक तास एका मोसंबीच्या आडोशाला बसून राहिली. तिने मांडवा गावात राहणाऱ्या तिच्या जावयाला सर्व हकीकत सांगितली. मात्र, ठिकाण कोणते आहे हे तिला सांगता न आल्यामुळे तिने आजूबाजूचे वर्णन सांगितले. त्यानंतर महिलेच्या जावयाने रात्री दहा वाजता चंदंनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शामसुंदर कोठाळे यांना याबाबत कळवले.