जळगाव- गेल्या वर्षी झालेल्या कमी पर्जन्यमानामुळे जिल्हाभरात दिवसेंदिवस पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. मागील २ आठवड्यात जिल्ह्यात १४ टँकरची संख्या वाढली आहे. सध्या १४७ गावांमध्ये १३४ टँकर सुरू आहेत. त्याबरोबरच जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर आहे. जनावरांना पाणी आणि चारा उपलब्ध होत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
दुष्काळाच्या झळा : जळगावच्या १४७ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा - जळगाव
जळगावमध्ये गेल्या वर्षी झालेल्या कमी पर्जन्यमानामुळे जिल्हाभरात दिवसेंदिवस पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. मागील २ आठवड्यात जिल्हात १४ टँकरची संख्या वाढली आहे.
जिल्ह्यात आठवड्याला सरासरी टँकरची संख्या ५ ने वाढत असल्याचे सध्याचे चित्र आहे. तसेच निवडणुकीचा काळ आणि सलगच्या सुट्ट्यामुळे टँकरची दररोज अपडेट होणारी आकडेवारीही खोळंबली आहे. आचार संहितेमुळे पाणी योजना रखडल्या असल्याने अनेक गावात पाण्याची टंचाई होत आहे. जिल्ह्यात पाण्याचा विषय गंभीर असताना राजकीय नेतेमंडळीही याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत.
जिल्ह्यात यावेळी वार्षिक सरासरीच्या केवळ ६३ टक्के इतका पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यात सर्वच प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा नाही. अनेक प्रकल्पांमध्ये तर फेब्रुवारीच्या अखेरीच पाण्याने तळ गाठला आहे. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ११ एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील १४३ गावांमध्ये १२९ टँकर सुरू होते. मात्र, त्यानंतर अवघ्या १० दिवसातच अजून ४ गावांमध्ये ५ टँकरची वाढ झाली आहे. तर येत्या काही दिवसात ही आकडेवारी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
- प्रशासनाच्या उपाययोजना-
- जिल्ह्यातील ३८ टंचाईग्रस्त गावांना ५२ कूपनलिकांद्वारे पाणीपुरवठा
- २४२ गावांमध्ये २४७ विहिरी अधिग्रहित करून पाणीपुरवठा करण्याची सोय
- ५४ गावांसाठी ९९ विहिरी मंजूर