महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगावात भरधाव बसने दोन दुचाकींना उडवले, दोघांचा मृत्यू तर तिघे जखमी - जळगाव अपघात बातमी

भरधाव वेगाने जाणाऱ्या एसटी बसने दोन दुचाकींना उडवले. या अपघातात एका दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या दुचाकीवरील तीन जण जखमी झाले.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

By

Published : Jun 23, 2021, 3:53 AM IST

जळगाव -भरधाव वेगाने जाणाऱ्या एसटी बसने दोन दुचाकींना उडवले. या अपघातात एका दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या दुचाकीवरील तीन जण जखमी झाले. हा अपघात मंगळवारी (दि. 21 जून) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावाजवळ जळगाव-औरंगाबाद महार्गावर घडला.

लिलाबाई धोंडू सोनार (वय 55 वर्षे) व गजानन किसन बावस्कर (वय 38 वर्षे), अशी मृतांची नावे असून, ते जामनेर तालुक्यातील चिंचखेडा येथील रहिवासी होते.

दवाखान्याचे काम आटोपून घरी परतताना काळाचा घाला

लिलाबाई सोनार यांना मुतखड्याचा त्रास होता. त्यांचा मुलगा बाळू धोंडू सोनार (वय 35 वर्षे) हा मंगळवारी सकाळी पत्नी सुरेखा, मुलगा योगेश तसेच मित्र गजानन बावस्कर यांच्यासह जळगावात आला होता. दवाखान्याचे काम आटोपून हे सर्व जण घरी परत जात होते. लिलाबाई व गजानन हे एका दुचाकीवर तर बाळू, सुरेखा व योगेश हे तिघे जण दुसऱ्या दुचाकीवरून घरी जात होते. जळगाव शहरापासून काही अंतरावर असलेल्या कुसुंबा गावाजवळ त्यांच्या दुचाकींना एसटी बसने धडक दिली. त्यात लिलाबाई व गजानन यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या दुचाकीवरील बाळू सोनार, सुरेखा सोनार व योगेश सोनार हे जखमी झाले.

जखमींवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार

या अपघातानंतर जखमींना त्वरित शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर लिलाबाई व गजानन यांचे मृतदेह देखील याठिकाणी विच्छेदनासाठी आणण्यात आले होते. या घटनेमुळे चिंचखेडा गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, या अपघातप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

हेही वाचा -जळगाव जिल्ह्यातही आढळले 'डेल्टा प्लस' व्हेरियंटचे सात रुग्ण; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

ABOUT THE AUTHOR

...view details