महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 17, 2020, 7:56 PM IST

Updated : May 17, 2020, 8:24 PM IST

ETV Bharat / state

अडचणीतील कामगारांची ट्रक चालकांकडून आर्थिक लूट; प्रतिमाणसी आकारतात हजारो रुपये भाडे

झारखंड, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल या आपल्या राज्यात जाण्यासाठी प्रति सीट तीन ते चार हजार रुपये देऊन हजारो कामगार, मजूर धोकादायक प्रवास करत आहेत. एकेका ट्रक आणि कंटेनरमध्ये 100 ते 125 जण अक्षरशः गुरांप्रमाणे कोंबून कोंबून भरले जात आहेत. एव्हढे पैसे मोजूनही वाहनांच्या कॅबिनवर देखील काही जण बसून प्रवास करत आहेत.

Truck
ट्रकमध्ये कोंबलेले मजूर उतरताना

जळगाव- कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभर लागू केलेल्या संचारबंदीचा कामगारांना फटका बसला आहे. महानगरांमध्ये उपासमारीची झळ बसल्याने हजारो कामगार, मजुरांनी कडक उन्हात पायी घराचा रस्ता धरला. त्यांची हीच अडचण ओळखून ट्रक, कंटेनर अशा अवजड वाहन चालकांकडून मजुरांची आर्थिक लूटमार सुरू आहे. घरी जाण्यासाठी प्रतिमाणसी तीन ते साडेतीन हजार रुपये आकारल्या जात आहेत. ट्रक, कंटेनर चालक-मालकांचे यात मोठे रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता आहे.

अडचणीतील कामगारांची ट्रक चालकांकडून आर्थिक लूट; प्रतिमाणसी आकारतात हजारो रुपये भाडे

कोरोनाचा संसर्ग बळावण्याची भीती

मुंबई, पुणे, सूरतसह विविध शहरांमधून झारखंड, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल या आपल्या राज्यात जाण्यासाठी प्रति सीट तीन ते चार हजार रुपये देऊन हजारो कामगार, मजूर धोकादायक प्रवास करत आहेत. एकेका ट्रक आणि कंटेनरमध्ये 100 ते 125 जण अक्षरशः गुरांप्रमाणे कोंबून कोंबून भरले जात आहेत. एव्हढे पैसे मोजूनही वाहनांच्या कॅबिनवर देखील काही जण बसून प्रवास करत आहेत. कोरोनाचा उद्रेक पाहता सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे आहे. मात्र, ट्रकचालक पैसे कमविण्याच्या नादात नियम धाब्यावर बसवत आहेत. अशात कोरोनाचा संसर्ग बळावण्याची भीती आहे. कोरोना संसर्गजन्य स्थितीमुळे ‘लॉकडाऊन’ असल्याने परप्रांतीय मजुरांचे लोंढे ट्रक, कंटेनर, रिक्षा, टॅक्सी यासह मिळेल, त्या वाहनाने आपल्या राज्यात पोहोचत आहेत. अद्यापपर्यंत पोलिसांसह आरटीओनेही याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र, यामध्ये ट्रक, कंटेनरचे अपघात झाल्याच्या घटनाही घडल्या. यासह या प्रवासात ‘फिजिकल डिस्टन्स’सह नियमांचे पालन केले जात नसल्याने संसर्गाची भीती वाढली आहे.

ट्रक, कंटेनर आणतात थेट बसस्थानकात

यामुळे परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी आदेश काढत परप्रांतीयांच्या गाड्या अडवून त्यांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत केवळ एसटीनेच मोफत सोडण्याचे आदेश दिले आहेत. जळगावात उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी महामार्गावरून प्रवासी घेऊन धावणाऱ्या ट्रक, कंटेनर अडवून त्या बसस्थानकात आणत आहेत. या आधी केवळ पायी चालणाऱ्या परप्रांतीयांना आणले जात होते. आता मात्र थेट वाहनेच येत असल्याने बसस्थानकातील गर्दी चार पटीने वाढली आहे.

मजुरांच्या राज्यातील सीमेपर्यंतच सोडणार एसटी बस, पुढे काय?

परप्रांतीय मजुरांना घेऊन धावणारे ट्रक, कंटेनर आरटीओ विभागाकडून पकडले जात असल्याने अनेक प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. वाहन पकडल्यानंतर त्यांनी मोजलेले भाड्याचे पैसे परत मिळत नाही, शिवाय एसटी बसने फक्त राज्याच्या सीमेपर्यंतच जाता येते. त्यामुळे पुढे काय ? हा प्रश्नच आहे. दुसरीकडे, आरटीओ विभागाने आता प्रवासी वाहतूक करणारी मालवाहू वाहने पकडण्याची मोहीम सुरू केल्याने एसटी प्रशासनावर देखील परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्याचा ताण वाढला आहे. याआधी केवळ पायी जाणाऱ्या परप्रांतीय मजुरांना सोडले जात होते. पण आता वाहने अडवली जात असल्याने एकेका वाहनात 100 ते 125 परप्रांतीय बसस्थानकात दाखल होत आहेत. दिवसभरात अशी अनेक वाहने पकडली जात असल्याने एसटी प्रशासनावर ताण पडतो आहे.

Last Updated : May 17, 2020, 8:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details