महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 23, 2020, 9:27 AM IST

Updated : Dec 23, 2020, 11:51 AM IST

ETV Bharat / state

जळगावात पारा 10 अंशांवर; जिल्ह्यात हंगामातील निच्चांकी तापमानाची नोंद

बुधवारी जळगावात 10 अंश सेल्सिअस इतके कमी तापमान नोंदवले गेले. यावर्षीच्या हंगामातील हे सर्वात निच्चांकी तापमान आहे.गेल्या 8 दिवसात जळगावच्या किमान तापमानात तब्बल 10 अंशांची घट झाली आहे. गेल्या आठवड्यात अवकाळीमुळे किमान तापमानात वाढ झाली होती. 8 दिवसांपूर्वी किमान तापमान 19 अंशांवर होते. मात्र, बुधवारी तापमान 10 अंशांपर्यंत खाली आले.

jalgao cold news
जळगावात पारा 10 अंशांवर

जळगाव -जिल्ह्यातील तापमानाचा पारा कमालीचा घसरला आहे. बुधवारी जळगावात 10 अंश सेल्सिअस इतके कमी तापमान नोंदवले गेले. यावर्षीच्या हंगामातील हे सर्वात निच्चांकी तापमान आहे. जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर वातावरणात मोठा बदल होत आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांना कोणतीही अडथळा नसल्याने जिल्ह्याच्या तापमानात मोठी घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जळगावात किमान तापमान 10 अंशांपर्यंत खाली घसरल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. यंदा थंडीचे आगमन ऑक्टोबर महिन्यातच झाले होते. मात्र, त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात व डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात देखील थंडी गायबच होती. वातावरणातील बदलामुळे व सातत्याने निर्माण होणाऱ्या चक्रीवादळामुळे अवकाळी पावसाची स्थिती निर्माण झाल्यामुळे थंडी गायब झाली होती. मात्र, आता वातावरण पूर्णपणे कोरडे झाले आहे. यामुळे उत्तरेकडून येणारे थंड वारे सक्रिय झाले आहेत. त्यामुळे गेल्या चार दिवसात तापमानात मोठी घट झाली आहे.
8 दिवसात 10 अंशांची घट
गेल्या 8 दिवसात जळगावच्या किमान तापमानात तब्बल 10 अंशांची घट झाली आहे. गेल्या आठवड्यात अवकाळीमुळे किमान तापमानात वाढ झाली होती. 8 दिवसांपूर्वी किमान तापमान 19 अंशांवर होते. मात्र, बुधवारी तापमान 10 अंशांपर्यंत खाली आले. आठवडाभर तापमान स्थिर राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. दरम्यान, कमाल तापमानात फार काही घट झाली नसून, कमाल तापमान 29 ते 31 अंशांवर स्थिर आहे.
थंडी रब्बीला लाभदायी
कडाक्याच्या थंडीमुळे रब्बी हंगामाला मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. कडाक्याचा थंडीमुळे रब्बी पिकांना जास्त पाणी भरण्याचे काम पडत नाही. गहू व हरभऱ्याच्या वाढीसाठी देखील थंडी उपयोगाची ठरत आहे. तालुक्यात रब्बी हंगामाची जवळ-जवळ 100 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.
थंडी वाढण्याची कारणे
आठवड्याभरात उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे प्रमाण कमी झाल्यामुळे तापमानात सारखी वाढ होती होती. मात्र, सोमवारी व मंगळवारी जम्मू काश्मिरच्या पर्वतीय भागात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली. त्यानंतर उत्तरप्रदेशातील काही भागात झालेल्या गारपिटीमुळे थंड वारे पुन्हा सक्रिय झाले आहे. तसेच या वाऱ्यांचा वेग व प्रमाण देखील जास्त असल्याने उत्तर महाराष्ट्रात पुन्हा थंडीचे आगमन जिल्ह्यात झाले आहे. दोन दिवसांपासून जिल्ह्यात वाऱ्यांचा वेग देखील वाढला आहे. जळगाव शहरात 9 ते 11 किमी प्रतितास या वेगाने वारे वाहत आहेत. दाब जास्त असल्याने वाऱ्यांचा वेग वाढत असतो. दरम्यान, अजून दोन दिवस ही स्थिती कायम राहण्याचा अंदाज असून, त्यानंतर उत्तरेकडील वाऱ्यांच वेग मंदावणार आहे.

आठवडाभरात असे घसरले तापमान
17 डिसेंबर - 17 अंश
18 डिसेंबर - 16 अंश
19 डिसेंबर- 14 अंश
20 डिसेंबर- 12 अंश
21 डिसेंबर- 11 अंश
22 डिसेंबर - 10 अंश

राज्यभरातही थंडीची लाट

देशातील उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये आलेली शीतलहर आता राज्यातही परिणाम दाखवू लागली आहे. राज्यात सर्वात निचांकी तापमान परभणीत नोंदवले गेले आहे. मंगळवारी 5.1 तर आज तापमानात वाढ होऊन पारा 5.5 अंशावर गेला आहे. नांदेड जिल्ह्यातही चांगलीच थंडी वाढली असून तापमान 10 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आले आहे. मंगळवारी विविध जिल्ह्यातील तापमानाची नोंद-

परभणी - 5.1 अंश सेल्सिअस

धुळे - 5.5 अंश सेल्सिअस

लातूर - 15 अंश सेल्सिअस

रायगड - 18 अंश सेल्सिअस

नाशिक - 8.4 अंश सेल्शिअस

नागपूर - 8.6 अंश सेल्शिअस

गोंदिया - 7.8 अंश सेल्शिअस

सांगली - 12.6 अंश सेल्शिअस

अमरावती - 12.5 अंश सेल्शिअस

अकोला - 10.6अंश सेल्शिअस

ठाणे - 22अंश सेल्शिअस

हेही वाचा -तेलुगू भाषेला पश्चिम बंगालमध्ये अधिकृत भाषेचा दर्जा प्राप्त

Last Updated : Dec 23, 2020, 11:51 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details