जळगाव -मनपा प्रशासनाने शहरात अमृत पाणी पुरवठा योजनेतंर्गत एका अपार्टमेंटमध्ये एकच कनेक्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, शहरात अनेक भागात जुने अपार्टमेंट आहेत. याठिकाणी पाण्याची टाकी किंवा सम देखील तयार करणे कठीण आहे. त्यामुळे अशा अपार्टमेंटमधील रहिवाश्यांना स्वतंत्र नळकनेक्शन देण्यात यावे अशी मागणी शहरातील शिवकॉलनी परिसरातील रहिवाश्यांनी केली आहे. यामागणीसाठी या भागातील नागरिकांनी मंगळवारी महापौर भारती सोनवणे, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांची भेट घेतली.
आपल्या मागणीबाबत मनपा आयुक्तांना निवेदन सादर केले. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, प्रा.सचिन पाटील, प्रतिभा देशमुख, गजानन देशमुख, शहर अभियंता अरविंद भोसले, सुशिल साळुंखे, योगेश बोरोले आदी उपस्थित होते. निवेदन सादर केलेल्या शिवकॉलणी भागातील रहिवाश्यांचे अपार्टमेंटचे बांधकाम १९८५ सालचे आहे. त्याठिकाणी अमृत योजनेसाठी पाण्याची टाकी बांधण्याची व्यवस्था नाही. सम बांधणेही कठीण आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने ठराविक अपार्टमेंटधारकांना दिलासा द्यावा अशी मागणी रहिवाश्यांनी केली. याठिकाणी प्रत्येकाला स्वतंत्र नळ संयोजन देण्याचीही मागणी करण्यात आली. यावेळी आयुक्तांनी पाहणी करून योग्य तो मार्ग काढण्याच्या सूचना अभियंत्यांना दिल्या.
नागरिकांची तक्रार -
नागरिकांनी महापौर आणि आयुक्तांना निवेदन देत जमिनी लगत, भूमीगत टाकी तयार केल्यास जुन्या इमारतींना धोका आहे. एकाच साठवण टाकीतून पाण्याचे असमान वितरण आणि वापर झाल्याने वाद होण्याची शक्यता आहे. नवीन टाकीच्या बांधकाम खर्चास जबाबदार कोण, संयुक्तिक नळ संयोजनची पाणीपट्टी भरण्यास अपार्टमेंटमधील कुणी नकार दिल्यास कोण जबाबदार राहणार असे प्रश्न नागरिकांनी उपस्थित केले.