महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 25, 2019, 4:54 PM IST

ETV Bharat / state

शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी 25 हजारांची मदत द्या; शिवसेनेचा जळगाव तहसील कार्यालयावर मोर्चा

शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी किमान 25 हजार रुपये आर्थिक मदत जाहीर करावी, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीकविम्याची रक्कम त्वरित जमा करावी, यासारख्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला होता. शेतकऱ्यांची थट्टा करू नका अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा आक्रमक इशारा शिवसैनिकांनी यावेळी दिला आहे.

शिवसेनेचा जळगाव तहसील कार्यालयावर मोर्चा

जळगाव -अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील पीकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून शासनाने त्वरित प्रतिहेक्टरी 25 हजार रुपये आर्थिक मदत करावी, या प्रमुख मागणीसाठी आज (25 नोव्हेंबर) दुपारी शिवसेनेच्या वतीने जळगाव तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता.

शिवसेनेचा जळगाव तहसील कार्यालयावर मोर्चा

जिल्ह्यात गेल्या चार ते पाच वर्षांपासून भीषण दुष्काळ होता. त्यानंतर यावर्षी चांगला पाऊस झाला. पिकेही उत्तम होती. मात्र, ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस राज्यभरात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. उडीद, मूग, ज्वारी, बाजरी यासारख्या कडधान्य पीकांसह मका, सोयाबीन, कापूस ही नगदी पिकेही हातून गेली. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी किमान 25 हजार रुपये आर्थिक मदत जाहीर करावी, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीकविम्याची रक्कम त्वरित जमा करावी, यासारख्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चात शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चा तहसील कार्यालयावर धडकल्यानंतर तहसीलदार वैशाली हिंगे यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. दरम्यान, शिवसेनेच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला.

हेही वाचा -साहेब...५ एकरात पिकला ३ क्विंटल कापूस, कर्ज कसे फेडायचे; शेतकऱ्यांनी केंद्रीय समितीसमोर मांडल्या व्यथा

शेतकऱ्यांची थट्टा करू नका

शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी आठ हजार रुपये मदत जाहीर करून एकप्रकारे थट्टाच केली आहे. याचा शिवसेना निषेध करत असल्याचेही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले. शेतकऱ्यांची थट्टा करू नका अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा आक्रमक इशारा शिवसैनिकांनी यावेळी दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details