महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चंद्रकांत पाटील पुरात वाहून आलेले उमेदवार; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची टीका

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली. ते आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जळगाव दौऱ्यावर आले आहेत.

By

Published : Oct 11, 2019, 3:14 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयत पाटील

जळगाव -विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचे राजकारणच संपून जाईल, असे वक्तव्य करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी आज जळगावात खरपूस शब्दात समाचार घेतला. 'चंद्रकांत पाटील हे पुण्यातील पुरात वाहून आलेले उमेदवार आहेत. त्यांनी शरद पवारांवर काय बोलावे. पुरात वाहून आलेला उमेदवार आम्हाला नको आहे, असे पुणेकर म्हणत आहेत. त्यामुळे चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य फार कुणी मनावर घेतले असेल असे मला वाटत नाही, अशी टीका जयंत पाटलांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयत पाटील

विधानसभा निवडणुकीतील आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जयंत पाटील जळगाव दौऱ्यावर आलेले आहेत. शुक्रवारी सकाळी त्यांनी पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. जयंत पाटलांनी याप्रसंगी भाजप सरकारच्या ध्येयधोरणांवर सडकून टीका केली.

जयंत पाटील पुढे म्हणाले, मुख्यमंत्री म्हणतात की आम्हाला समोर विरोधकच दिसत नाहीत. मात्र, त्यांना 'शरद पवार' या नावाचीच भीती वाटते. समोर विरोधकच नसते तर त्यांना मोदींच्या १०, अमित शहांच्या २० तसेच स्वतः मुख्यमंत्री फडणवीसांना १०० सभा का घ्याव्या लागत आहेत. महाजनादेश यात्रा नुकतीच पार पडलेली असताना एवढा खटाटोप का म्हणून करावा लागत आहे. जर तुमच्या बाजूने जनमत आहे तर घरी बसा ना, आपोआपच निवडून याल. पण भाजपला शरद पवारांची भीती वाटते. म्हणून अमित शाह प्रत्येक सभेत शरद पवार आणि राष्ट्रवादीला लक्ष्य करतात. याचाच अर्थ राष्ट्रवादीची स्थिती बळकट आहे, असेही पाटील यावेळी म्हणाले.

केंद्र आणि राज्याची आर्थिक अवस्था बिकट-

चुकीच्या ध्येयधोरणांमुळे केंद्र आणि राज्याची आर्थिक अवस्था बिकट झाली आहे. या संकटामुळे आता सरकारने खासगीकरणाचा मार्ग अवलंबला आहे. जिओ कंपनीसाठी बीएसएनएल, एमटीएनएलचे खच्चीकरण करण्यात आले. आता भारतीय रेल्वेचा क्रमांक आहे. या सरकारने रेल्वेच्या बाबतीत अतिशहाणपणा केला. रेल्वेचे बजेट बेसिक बजेटमध्ये मर्ज केले. त्यामुळे रेल्वेच्या बाबतीत काय होतंय हे जनतेला कळत नाही. हा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न आहे. हळूहळू रेल्वेच्या खासगीकरणाचा डाव साधला जात आहे. एकप्रकारे सर्वसामान्य जनतेच्या पोटावर पाय ठेवण्याचे काम सरकारने केले आहे, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details