महाराष्ट्र

maharashtra

'बीएचआर प्रकरणाची कारवाई राजकीय हेतूने नाहीच, संशयितांची चौकशी व्हायलाच हवी'

By

Published : Jun 18, 2021, 12:09 PM IST

बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहारात हजारो ठेवीदारांचा पैसा असुरक्षित झाला. त्यामुळे हजारो संसार उद्ध्वस्त झाले. आता या गैरव्यवहार प्रकरणाच्या चौकशीला वेग आला आहे. त्यामुळे हा काही राजकीय विषय नाही. तो ठेवीदारांच्या संरक्षणाचा विषय आहे. या प्रकरणात जे दोषी असतील त्यांना शासन होईलच, मग तो लहान असो किंवा मोठा असो.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे

जळगाव -बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणात होत असलेली कारवाई ही राजकीय हेतूने केली जात आहे, असे नाही. या प्रकरणात कोणाची नावे आहेत, याची मला माहिती नाही. परंतु, या प्रकरणाशी संबंधित असणाऱ्या सर्वांची चौकशी व्हायलाच हवी, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले आहे. एकनाथ खडसे हे नुकतेच मुंबईहून जळगावात परतले. शुक्रवारी सकाळी ते आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते. यावेळी खडसेंनी मत मांडले. बीएचआर प्रकरणात सुरू असलेल्या चौकशीचे खडसेंनी स्वागत केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे
माझ्या एवढ्या चौकशा झाल्या, तो राजकीय विषय नव्हता तर हा कसा असेल?
एकनाथ खडसे यांनी यावेळी बोलताना आपल्या विरोधकांना चांगलेच चिमटे काढले. ते म्हणाले ' बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहारात हजारो ठेवीदारांचा पैसा असुरक्षित झाला. त्यामुळे हजारो संसार उद्ध्वस्त झाले. आता या गैरव्यवहार प्रकरणाच्या चौकशीला वेग आला आहे. त्यामुळे हा काही राजकीय विषय नाही. तो ठेवीदारांच्या संरक्षणाचा विषय आहे. या प्रकरणात जे दोषी असतील त्यांना शासन होईलच, मग तो लहान असो किंवा मोठा असो... माझी यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, आयकर विभाग, लोकायुक्त, दहशतवाद विरोधी पथकाकडून चौकशी झाली आहे. आता सध्या सक्तवसुली संचालनालयाकडून देखील चौकशी सुरू आहे. मी कोणताही गुन्हा केलेला नसताना माझ्या एवढ्या चौकश्या होऊ शकतात. तो राजकीय विषय नव्हता तर आता बीएचआर प्रकरणी सुरू असलेल्या कारवाईचा विषय राजकीय कसा असू शकतो? अशा तिरकस शब्दात खडसे यांनी विरोधकांना टोला लगावला.

अॅड. कीर्ती पाटलांच्या तक्रारीवरून सुरू आहे चौकशी-

खडसे पुढे म्हणाले, बीएचआर पतसंस्थेत कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाला होता. त्यामुळे या प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करावी, अशी मागणी जळगावातील ॲड. कीर्ती पाटील यांनी 2018 मध्ये केली होती. त्याच वेळी केंद्रीय सहकार मंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेने करावी, अशा सूचना केल्या होत्या. मात्र, मधल्या कालखंडात या प्रकरणाच्या चौकशीला वेग आला नाही. त्याला काही कारणे असतील, म्हणून चौकशी थांबली असावी. आता आर्थिक गुन्हे शाखेच्या चौकशीला वेग आला आहे. त्यात बऱ्याच गोष्टी समोर येत आहेत. शेकडो लोकांनी ठेवीदारांच्या ठेवी नाममात्र दरात घेऊन आपली कर्जे मॅचिंगच्या माध्यमातून फेडल्याचे दर्शवले आहे. बनावट कागदपत्रांचा वापर करून पात्रता नसताना अनेकांनी कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेतले. त्यामुळे पतसंस्था डबघाईला गेली, असेही खडसेंनी सांगितले. कर्जदारांकडून पैसा वसूल झाला तर ठेवीदारांना दिलासा मिळू शकतो, असेही ते यावेळी म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details