महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'टीका केल्याशिवाय नारायण राणेंचे अस्तित्त्वच राहू शकत नाही' - पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

मागील सरकारच्या काळात ज्या काही चुकीच्या गोष्टी घडल्या आहेत, त्या उघड होतीलच. त्यात कुणी भीती बाळगण्याचे कारण नाही. जे चांगले असेल ते चांगलंच असेल. जे उघड करण्यासारखे असेल ते उघड करावेच लागेल, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.

मंत्री गुलाबराव पाटील
मंत्री गुलाबराव पाटील

By

Published : Feb 19, 2020, 9:18 PM IST

जळगाव- कोकण दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नाणार प्रकल्पाबाबतच्या वक्तव्यानंतर नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले होते. मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्या राणेंना राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावात प्रत्युत्तर दिले आहे. नारायण राणेंना टीका करण्याशिवाय दुसरे काही येत नाही. टीका केल्याशिवाय त्यांचे अस्तित्त्वच राहू शकत नाही, अशा शब्दांत गुलाबराव पाटलांनी राणेंना चिमटा काढला आहे.

बोलताना मंत्री गुलाबराव पाटील

शिवजयंती निमित्ताने जळगावात सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने आज सायंकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीला हजेरी लावल्यानंतर गुलाबराव पाटील पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी नारायण राणेंच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे कोकणच्या विकासात काय योगदान आहे? असा सवाल नारायण राणेंनी केला होता. तसेच हे राज्य अधोगतीकडे चाललय. सरकार चालत नसून भ्रष्टाचाराची दुकाने सुरु आहेत आणि यात मुख्यमंत्री कार्यालयाचाही समावेश आहे, अशी टीका राणेंनी केली होती. या टीकेला गुलाबराव पाटलांनी प्रत्युत्तर दिले. टीका करणे हेच नारायण राणे यांचे काम आहे. त्याशिवाय दुसरे त्यांना येत नाही, असे गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.

दरम्यान, येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप मंत्र्यांच्या चौकशीचे अहवाल महाविकास आघाडी सरकार उघड करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. याबाबत गुलाबराव पाटलांना विचारणा केली असता त्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला. मागील सरकारच्या काळात ज्या काही चुकीच्या गोष्टी घडल्या आहेत, त्या उघड होतीलच. त्यात कुणी भीती बाळगण्याचे कारण नाही. जे चांगले असेल ते चांगलंच असेल. जे उघड करण्यासारखे असेल ते उघड करावेच लागेल. ज्या गोष्टी खऱ्या आहेत, त्या जनतेसमोर आणाव्याच लागतात, अशा शब्दांत गुलाबराव पाटील यांनीही अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजपला घेरण्यासाठी आखल्या जाणाऱ्या रणनितीचे संकेत दिले. महाविकास आघाडी सरकारकडून सुरू असलेल्या व्यूहरचनेमुळे भाजप नेत्यांच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा -'आमचं उष्ट कुणी खाऊ नये', औरंगाबादच्या नामकरणावरुन मनसेवर 'सेनास्त्र'

ABOUT THE AUTHOR

...view details