महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 15, 2020, 6:34 PM IST

Updated : Jun 15, 2020, 6:53 PM IST

ETV Bharat / state

जळगाव जिल्ह्यात खरिपाच्या पेरणीला सुरुवात; समाधानकारक पावसाने बळीराजा सुखावला

जळगाव जिल्ह्यात दरवर्षी सुमारे साडेसात लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाची लागवड होते. त्यात प्रमुख नगदी पीक असलेला कापूस 5 ते साडेपाच लाख हेक्टर, ज्वारी, बाजरी, मका यासारखी तृणधान्ये दीड ते 2 लाख हेक्टर, भुईमूग, सोयाबीन 30 ते 35 हजार हेक्टर त्याचप्रमाणे इतर पिकांची 25 ते 30 हजार हेक्टरवर लागवड होते. यावर्षी मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच चांगला पाऊस झाल्याने शेतकरी खरिपाची पेरणी करत आहेत.

farmers while in farm
शेतात काम करताना शेतकरी.

जळगाव -गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर चांगला आणि पेरणी योग्य पाऊस झाला आहे. त्यामुळे खरिपाच्या पेरणीला वेग आला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून लागलेल्या मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच पेरणीची कामे सुरू झाल्यामुळे बळीराजा सुखावला आहे. सध्या कापूस, मका, सोयाबीन तसेच उडीद, मूग अशा कडधान्याची पेरणी केली जात आहे.

जळगाव जिल्ह्यात खरिपाच्या पेरणीला सुरुवात; समाधानकारक पावसाने बळीराजा सुखावला

जिल्ह्यात दरवर्षी सुमारे साडेसात लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाची लागवड होते. त्यात प्रमुख नगदी पीक असलेला कापूस 5 ते साडेपाच लाख हेक्टर, ज्वारी, बाजरी, मका यासारखी तृणधान्ये दीड ते 2 लाख हेक्टर, भुईमूग, सोयाबीन 30 ते 35 हजार हेक्टर त्याचप्रमाणे इतर पिकांची 25 ते 30 हजार हेक्टरवर लागवड होते. यावर्षी मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच चांगला पाऊस झाल्याने शेतकरी खरिपाची पेरणी करत आहेत. पेरणीची कामे सुरू झाल्यामुळे लॉकडाऊनमध्ये अडचणींचा सामना करत असलेल्या मजुरवर्गाच्या हाताला काम मिळाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह मजुरवर्गातही चैतन्य निर्माण झाले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने यावर्षी मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात बाजारपेठ पूर्णपणे बंद होती. त्यामुळे शेतीशी निगडित उद्योग-व्यवसायावरही मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. या साऱ्या बाबींचा फटका काही प्रमाणात खरीप हंगामाला देखील बसला आहे. कृषीची बाजारपेठ उशिरा उघडल्याने जिल्ह्यातील पूर्वहंगामी कापूस लागवडीवर परिणाम झाला आहे. यावर्षी पूर्वहंगामी कापसाची लागवड नेहमीपेक्षा 20 ते 25 टक्क्यांनी घटली. आता शेतकरी हंगामी कापूस लागवडीसोबत मका, ज्वारी, बाजरी अशा कडधान्याच्या पेरणीवर अधिक भर देत आहेत. त्यामुळे यंदा कडधान्याचा पेरा नेहमीच्या तुलनेत 25 टक्क्यांहून अधिक होईल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे.

खते व बियाण्यांचा तुटवडा भासणार नाही -

खरीप हंगामासाठी कृषी अधीक्षक कार्यालयाने खते आणि बियाण्यांची जेवढी मागणी नोंदवली होती तितका साठा मंजूर झाला आहे. जिल्ह्यात कोणत्याही परिस्थितीत खते आणि बियाण्यांची कमतरता भासणार नाही, अशी माहिती कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी दिली आहे.

दरम्यान, खते आणि बियाण्यांची लिंकिंग रोखण्यासाठी कृषी विभागाने भरारी पथके नेमली असून प्रत्येक तक्रारीची दखल घेतली जाईल, असेही भोकरे यांनी सांगितले.

बियाण्यांचा मंजूर साठा -

  • कापूस (बीजी 2 आणि नॉन बीटी) - 25 लाख 52 हजार पाकिटे
  • ज्वारी - 4 हजार 496 क्विंटल
  • बाजरी - 600 क्विंटल
  • मका - 10 हजार क्विंटल
  • सोयाबीन - 7 हजार क्विंटल
  • तूर - 1 हजार 40 क्विंटल
  • मूग - 2 हजार क्विंटल
  • उडीद - 2 हजार 575 क्विंटल

खतांचा मंजूर साठा -

खरीप हंगामासाठी जळगाव जिल्ह्यासाठी सर्व खते मिळून 3 लाख 40 हजार मेट्रीक टन एवढी मागणी नोंदविण्यात आली होती. त्यापैकी कृषी आयुक्तालयाकडून 3 लाख 20 हजार मेट्रीक टन एवढा साठा मंजूर झाला आहे. त्यात युरिया 1 लाख 11 हजार मेट्रीक टन, डीएपी 12 हजार 690 मेट्रीक टन, संयुक्त खते 72 हजार 920 मेट्रीक टन व इतर खते 1 लाख 25 हजार मेट्रीक टन असा समावेश आहे.

Last Updated : Jun 15, 2020, 6:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details