जळगाव -कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू असतानाही जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने यावर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वितरित केली आहेत. मात्र, कोरोनामुळे शाळा सुरू नसल्याने केवळ पुस्तके मिळून उपयोग काय? असा सवाल ग्रामीण भागातील पालक वर्गाकडून उपस्थित केला जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय समोर आणला आहे. ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना हा पर्याय परवडणारा नाही. त्यामुळे पुस्तके तर मिळाली मात्र, शिक्षण सुरू नाही, अशी स्थिती जळगाव जिल्ह्यात आहे.
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून 'सर्व शिक्षा अभियानां'तर्गत बालभारतीमार्फत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप केले जाते. दरवर्षी जून महिन्यात शाळा सुरू होऊन जातात, पण विद्यार्थ्यांना पुस्तके मिळत नसल्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडतात. मात्र, यावर्षी कोरोना महामारीच्या काळातही शिक्षण विभागाने योग्य नियोजन करत जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तके पोहचवली. जळगाव जिल्ह्यातील शाळांसाठी यावर्षी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने २५ लाख ६४ हजार ९५१ इतक्या पाठ्यपुस्तकांची मागणी शालेय शिक्षण विभागाकडे नोंदवली होती. त्यानुसार शालेय शिक्षण विभागाने पुस्तके उपलब्ध करून दिली. पुस्तके उपलब्ध झाल्यानंतर प्राथमिक शिक्षण विभागाने ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवली देखील. सद्यस्थितीत जळगाव जिल्ह्यात पहिली ते आठवीच्या १०० टक्के विद्यार्थ्यांना पुस्तके मिळाली आहेत. मात्र, कोरोनामुळे शाळाच सुरू नसल्याने पुस्तके मिळूनही विद्यार्थ्यांना शिक्षण मिळण्यास अडचणी येत आहेत.
आमच्या पोरांनी शिकायचे कसे?
१५ जूनपासून शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. मात्र, कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे शाळा प्रत्यक्षात सुरू झालेल्या नाहीत. शालेय शिक्षण विभागाचा ऑनलाइन शाळा सुरू करण्याचा खटाटोप सुरू आहे. ग्रामीण भागातील अडचणी लक्षात घेता लाखो विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून दूर आहेत. शिक्षण विभागाने यावर्षी वेळेत पाठ्यपुस्तके उपलब्ध केली असली तरी शाळाच सुरू नसल्याने या पुस्तकातून आमच्या पोरांनी शिकायचे कसे? असा प्रश्न ग्रामीण भागातील पालकांना पडला आहे. कोरोनामुळे शाळा बंद व ग्रामीण भागात न पोहचलेले ऑनलाइन शिक्षण यामुळे आमच्या पाल्यांचे भवितव्यच अंधारात सापडले असल्याच्या प्रतिक्रिया जळगाव तालुक्यातील आसोदा गावातील काही पालकांनी 'ई-टीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केल्या.