जळगाव - स्मशानभूमीत काम करणारे कर्मचारी हे अशा दुर्दैवी परिस्थितीत मृतांवर अंत्यसंस्काराची जबाबदारी एक नातेवाईक म्हणून पार पाडत आहेत. जात-पात, धर्म-पंथ एवढेच नव्हे तर स्वतःच्या भावना बाजूला ठेऊन ते अहोरात्र काम करत आहेत. 'त्यांच्या'मुळेच मृतांना खऱ्या अर्थाने मोक्षप्राप्ती होत आहे. म्हणूनच ते खरे कोरोना योद्धे आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. यासंदर्भात 'ईटीव्ही भारत'ने घेतलेला हा खास आढावा.
जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग अतिशय वेगाने सुरू आहे. दररोज शेकडोंच्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण देखील कमी नाही. दररोज दोन आकडी संख्येने कोरोनाचे बळीही जात आहेत. कोरोना पॉझिटिव्ह तसेच संभाव्य कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर संबंधित व्यक्तीचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी खबरदारी म्हणून नातेवाईकांच्या ताब्यात दिला जात नाही.
जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार मृतदेह प्लास्टिकच्या बॅगेत बांधून त्यावर तातडीने अंत्यसंस्कार केले जातात. कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह रुग्णालयातून स्मशानभूमीत आणणे, रुग्णवाहिकेतून तो काळजीपूर्वक उतरवून स्मशानभूमीतील दहन ओट्यावर चितेवर ठेवणे, विधी उरकून अग्निडाग देणे, चिता थंड झाल्यावर मृताची अस्थी नातेवाईकांच्या ताब्यात देणे, असे काम महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसह जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना करावे लागत आहे. सध्याच्या कठीण काळात ही मंडळी आपलं कुटुंब, भावना बाजूला ठेवून, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मृतांवर अंत्यसंस्कार करत आहे. कितीही वाईट वाटत असले तरी मन घट्ट करण्यापलीकडे ते काही करू शकत नाही.
हेही वाचा -महाराष्ट्रात कोरोनाचा कहर.! दिवसभरात तब्बल १० हजार ५७६ नव्या रुग्णांची नोंद
जळगावातील नेरीनाका परिसरातील स्मशानभूमीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार केले जातात. याठिकाणी कार्यरत असलेले महापालिकेचे कर्मचारी धनराज सपकाळे यांच्याकडे मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासह संपूर्ण प्रशासकीय नोंदी ठेवणे, अंत्यसंस्काराची कागदपत्रे घेणे, प्रमाणपत्र देणे अशी जबाबदारी आहे. मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांना मदतनीस म्हणून अमृत बिऱ्हाडे आणि काशिनाथ बिऱ्हाडे हे दोघे सोबतीला आहेत. त्याचप्रमाणे, जिल्हा शासकीय रुग्णालय अर्थात कोविड रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत आणण्याचे काम शववाहिका चालक रियाज सय्यद करत आहेत. हे चौघे जण कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या लोकांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी सांभाळत आहेत. विशेष म्हणजे, या चौघांनी गेल्या चार महिन्यात एक दिवसही सुटी घेतलेली नाही.
बिऱ्हाडे बंधूंनी उदरनिर्वाहासाठी स्वीकारले अंत्यसंस्काराचे काम...
अमृत बिऱ्हाडे आणि काशिनाथ बिऱ्हाडे हे दोघे सख्खे भाऊ. जळगाव तालुक्यातील नशिराबाद हे त्यांचे गाव. दोघांचे शिक्षण जेमतेम, घरची परिस्थिती बेताची. अशा परिस्थितीत उदरनिर्वाहासाठी त्यांनी स्मशानभूमीत मृतांवर अंत्यसंस्कार करण्याचे काम स्वीकारले. सध्या कोरोनामुळे स्मशानभूमीत मृतांच्या नातेवाईकांना येऊ दिले जात नसल्याने आम्हालाच सर्व सोपस्कार पार पाडावे लागतात, असे ते म्हणाले. एका दिवसाकाठी 8 ते 10 मृतांवर अंत्यसंस्कार होतात. प्रत्येक वेळी नवे पीपीई कीट परिधान करणे, मृतावर अंत्यसंस्कार झाल्यावर ते पीपीई कीट नष्ट करणे खूपच कठीण काम असते.