महाराष्ट्र

maharashtra

इंधन दरवाढीविरोधात जळगाव काँग्रेसकडून वाहनांना श्रद्धांजली वाहत आंदोलन

By

Published : Jun 29, 2020, 4:30 PM IST

आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे दर प्रतिबॅरल अत्यंत कमी असताना गेल्या महिनाभरापासून पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. महिनाभरात पेट्रोलचे दर 10 ते 11 रुपयांनी तर डिझेलचे दर 10 ते 12 रुपयांनी वाढले आहेत. देशात काही ठिकाणी तर इतिहासात प्रथमच डिझेलचे दर हे पेट्रोलपेक्षा अधिक आहेत.

jalgaon congress agitation against fuel price hike
इंधन दरवाढ विरोधात जळगाव काँग्रेसचे आंदोलन

जळगाव - सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर भडकल्याने सर्वसामान्य जनतेला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे दर अत्यंत कमी असताना केंद्र सरकार इंधनाचे दर वाढवत आहे. त्यामुळे जळगाव जिल्हा काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारच्या ध्येय-धोरणांचा निषेध व्यक्त करण्यासाठी सोमवारी काँग्रेस भवनात लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. यावेळी इंधन दरवाढीला विरोध म्हणून, काँग्रेसच्या वतीने प्रतिकात्मकरित्या मृत वाहनांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे दर प्रतिबॅरल अत्यंत कमी असताना गेल्या महिनाभरापासून पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. महिनाभरात पेट्रोलचे दर 10 ते 11 रुपयांनी तर डिझेलचे दर 10 ते 12 रुपयांनी वाढले आहेत. देशात काही ठिकाणी तर इतिहासात प्रथमच डिझेलचे दर हे पेट्रोलपेक्षा अधिक आहेत. इंधनाचे दर वाढल्याने आता महागाईचा भडका होण्याची भीती आहे. एकीकडे संपूर्ण देश कोरोनासारख्या महामारीशी लढत आहे. त्यात आता पुन्हा इंधन दरवाढीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. केंद्र सरकारने इंधनाचे वाढवलेले दर कमी करावेत, या प्रमुख मागणीसाठी सोमवारी दुपारी जळगाव जिल्हा काँग्रेस तसेच जळगाव जिल्हा काँग्रेस विद्यार्थी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

इंधन दरवाढ विरोधात जळगाव काँग्रेसचे आंदोलन

हेही वाचा..."विरोधकांनी आता स्वप्न पाहणे देखील सोडून द्यावे, हे सरकार पाच वर्ष चालणार.."

मोदी सरकारच्या जाचक धोरणांमुळे अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. आधीच नोटबंदी, जीएसटी कर लागू करण्याचे निर्णय फसले. त्यातून अर्थव्यवस्था सावरत नाही तोच आता कोरोनासारख्या महामारीचे संकट उभे राहिले. कोरोनामुळे जाहीर केलेल्या टाळेबंदीमुळे सर्वच उद्योग-व्यवसाय ठप्प आहेत. सर्वसामान्य लोकांच्या हातचा रोजगार हिरवला गेला. लोकांना दोनवेळच्या जेवणाची भ्रांत असताना आता इंधनाचे दर सतत वाढत असल्याने महागाई वाढणार आहे. एकंदरीत मोदी सरकारला सर्वसामान्य जनतेशी काहीएक देणेघेणे नसून हे सरकार लोकांची पिळवणूक करत आहे, असा आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली.

जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन...

काँग्रेस भवनात आंदोलन केल्यानंतर काँग्रेस आणि काँग्रेस विद्यार्थी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले. केंद्र सरकारने इंधनाचे दर त्वरित कमी करावेत, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांच्या हिताच्या निर्णय घ्यावेत, अशा प्रमुख मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. संदीप पाटील, काँग्रेस विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, या आंदोलनप्रसंगी तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतेवेळी काँग्रेसच्या आमदारांसह बड्या पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याचे पाहायला मिळाले. मोजक्या आणि नेहमीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details