जळगाव - महावितरण कंपनीने शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा करायला हवा, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. महावितरण कंपनीकडून रात्रीच्या वेळी वीजपुरवठा होत असल्याने शेती पिकांना पाणी देताना शेतकऱ्यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो आहे. शेतकऱ्यांच्या या समस्येवर राज्य शासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
जळगाव जिल्ह्यात यावर्षी वार्षिक सरासरीच्या 145 टक्के इतका पाऊस झाला. पाऊस मोठ्या प्रमाणावर झाल्याने नद्या, नाले, विहिरी तसेच कुपनलिकांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. पाणी असल्याने यावर्षी रब्बीचा हंगाम जोमात आहे. अनेक शेतकऱ्यांनी गहू, हरभरा, मका अशी पिके घेतली आहेत. आता उन्हाचा तडाखा वाढू लागल्याने पिकांना पाण्याची गरज भासत आहे. मात्र, महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांच्या अडवणुकीचे धोरण सुरू आहे. जिल्ह्यात शेतीसाठी दिवसा नाही तर रात्रीच्या वेळी वीजपुरवठा केला जात आहे. रात्री 11 ते सकाळी 7 वाजेपर्यंत वीजपुरवठा होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला जीव मुठीत घेऊन रात्रीच्या वेळी पिकांना पाणी द्यावे लागत आहे. रात्री पिकांना पाणी देत असताना जंगली श्वापदे, सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती असते.
हेही वाचा -मराठी भाषा गौरव दिन : सरकारच्या कारभाराबद्दल खान्देशी बोलीभाषा 'अहिराणी'त प्रतिक्रिया...