महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 8, 2021, 8:54 PM IST

ETV Bharat / state

कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाची सामाजिक बांधिलकी, अंत्यविधीसाठी महापालिकेला दिली शेकडो टन लाकडे

कोरोनामुळे मृतांच्या संख्येत झालेली वाढ पाहाता, जळगाव शहराच्या स्मशानभूमीत गरजू व निराधारांना अंत्यविधीसाठी लाकडे कमी पडू नये, यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने, विद्यापीठ परिसरातील झाडांची जळाऊ लाकडे महापालिकेकडे मोफत सुपूर्द केली आहेत. ही लाकडे अंदाजे १५० ते २०० टन असण्याची शक्यता आहे.

अंत्यविधीसाठी मोफत लाकडे
अंत्यविधीसाठी मोफत लाकडे

जळगाव -कोरोनामुळे मृतांच्या संख्येत झालेली वाढ पाहाता, जळगाव शहराच्या स्मशानभूमीत गरजू व निराधारांना अंत्यविधीसाठी लाकडे कमी पडू नये, यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने, विद्यापीठ परिसरातील झाडांची जळाऊ लाकडे महापालिकेकडे मोफत सुपूर्द केली आहेत. ही लाकडे अंदाजे १५० ते २०० टन असण्याची शक्यता आहे.

कोरोनाच्या या उद्भवलेल्या स्थितीत स्मशानभूमीत लाकडे कमी पडू नयेत, यासाठी प्रभारी कुलगुरु प्रा. ई.वायुनंदन यांच्या पुढाकाराने विद्यापीठाने सामाजिक बांधिलकीच्या नात्याने विद्यापीठ परिसरातील जळाऊ लाकडे महापालिकेकडे मोफत सुपूर्द करण्याचा निर्णय घेतला. विद्यापीठाच्या ६५० एकरच्या परिसरात विविध वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. यातील कोसळलेली किंवा वाळलेली झाडे एकत्रित करुन ठेवली होती. त्यामध्ये लिंब, गुलमोहर, सुबाभूळ, निलगिरी तसेच काही काटेरी वृक्षांचा समावेश आहे. महापालिकेशी विद्यापीठाने पत्रव्यवहार केला व ही लाकडे मोफत देण्याची तयारी दर्शविली, महापालिकेनेही त्याला प्रतिसाद दिला. त्यानुसार महापालिकेच्या वाहनाने ही लाकडे उचलण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

विद्यापीठाचे मानले आभार

शनिवारी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, महापालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, माजी महापौर विष्णू भंगाळे यांनी विद्यापीठाला भेट दिली व विद्यापीठ प्रशासनाला आभाराचे पत्र दिले. संकटाच्या काळात विद्यापीठाने पुढाकार घेऊन सामाजिक ऋण म्हणून मोफत लाकडे पुरवल्याबददल महापौर व आयुक्तांनी विद्यापीठाचे आभार मानले.

'सामाजिक बांधिलकीच्या नात्याने मदत'

विद्यापीठाच्या परिसरात गेल्या दोन वर्षापासून वाळलेली व कोसळून पडलेल्या झाडांची लाकडे एकत्र करुन ठेवण्यात आली होती. सध्या कोरोनाच्या काळात मृतांची संख्या वाढली असून, स्मशानभूमीत लाकडे कमी पडू नयेत, यासाठी विद्यापीठाने महापालिकेला ही सर्व लाकडे मोफत देण्याचा निर्णय घेतला. हे विद्यापीठ संकटाच्या काळात समाजाच्या मदतीला नेहमीच घावून जात असते. तोच पायंडा यावेळी देखील कायम ठेवण्यात आला, अशी प्रतिक्रिया प्रभारी कुलगुरू प्रा.ई. वायुनंदन यांनी दिली.

हेही वाचा -पुण्यात सहायक पोलीस निरीक्षकच्या आईच्या डोक्यात घातला लोखंडी रॉड, जागीच मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details