जळगाव- विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून भाजपवर प्रचंड नाराज असलेले भाजप नेते एकनाथ खडसे यांची नाराजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आज जळगावात झालेल्या बैठकीनंतरही कायम आहे. जळगाव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीव्यतिरिक्त अन्य कोणत्याही विषयावर या बैठकीत चर्चा झाली नाही. खुद्द खडसेंनी याबाबतची माहिती दिली आहे. दरम्यान, फडणवीस आणि खडसेंच्या बैठकीला मध्यस्थीसाठी उपस्थित असलेले माजी मंत्री गिरीश महाजन यांची शिष्टाई देखील मनोमिलनात कामी आली नाही.
विधानसभा निवडणुकीत माझे तिकीट देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी संगनमताने कापले. माझी राजकीय कारकीर्द संपुष्टात आणायचा त्यांचा डाव होता, असा आरोप दोन दिवसांपूर्वी करत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे भाजप नेते एकनाथ खडसे यांच्यासोबत आज देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी बैठक घेतली. नागपुरातून पहाटे जळगावात दाखल झालेले फडणवीस सकाळी 10 वाजता गिरीश महाजन यांच्यासोबत खडसेंना भेटले. तीनही नेत्यांनी एकत्रित न्याहरी करत जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीबाबत बंद दाराआड सखोल चर्चा केली. अर्धा पाऊण तास चाललेल्या या चर्चेच्या केंद्रस्थानी केवळ जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा विषय होता. बैठकीनंतर फडणवीस हेलिकॉप्टरने नंदुरबारच्या दिशेने रवाना झाले. खडसेंच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांच्यासोबतची बैठक महत्त्वाची मानली जात होती. परंतु, ही बैठक कोणत्याही निष्कर्षाशिवाय पार पडल्याने खडसेंच्या नाराजीबाबत निर्णय होऊ शकला नाही.
खडसेंना नव्हते भेटीचे आमंत्रण-
धुळे व नंदुरबार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी जळगाव मार्गे जाणारे देवेंद्र फडणवीस हे जळगावात काही काळ विश्रांतीला थांबणार होते. हा दौरा नियोजित होता. मात्र, या दौऱ्यात फडणवीस, खडसे आणि महाजन यांच्यातील एकत्रित बैठक घेण्याचे ठरलेले नव्हते. फक्त महाजन आणि फडणवीस हे भेटणार होते. खडसेंना या भेटीचे आमंत्रण नव्हते. परंतु, खडसेंच्या नाराजीची दखल घेऊन त्यांची नाराजी दूर करण्यासाठी जिल्हा परिषद निवडणुकीचे निमित्त पुढे करत बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीला उपस्थित रहावे म्हणून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सकाळी खडसेंना फोन केला. तुम्ही जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी बैठकीला उपस्थित रहावे म्हणून खडसेंना सांगण्यात आले होते. त्यानंतर खडसे फडणवीस यांच्या भेटीला गेले. ही माहिती खुद्द खडसेंनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना दिली.