महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिल्हाधिकाऱ्यांकडून ग्रामसेवकाला दमदाटी; मन:स्तापामुळे ग्रामसेवकाची प्रकृती बिघडली

यावल तालुक्यातील चिखली येथील ग्रामसेवक पी. व्ही. तळेले यांना जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या कामाच्या विषयावरून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत निलंबित करण्याची धमकी दिली. यामुळे मन:स्ताप झाल्याने ग्रामसेवकाची प्रकृती बिघडली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

By

Published : Jun 27, 2019, 3:44 AM IST

जिल्हाधिकाऱ्यांकडून ग्रामसेवकाला दमदाटी

जळगाव- प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या कामाच्या विषयावरून जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी एका ग्रामसेवकाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत निलंबित करण्याची धमकी दिली. बुधवारी हा प्रकार घडला. यामुळे मन:स्ताप झाल्याने ग्रामसेवकाची प्रकृती बिघडली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, ग्रामसेवक संघटनेने या घटनेची गांभीर्याने दखल घेत गुरुवारपासून प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे काम बंद करण्याचा इशारा दिला आहे.

यावल तालुक्यातील चिखली येथील ग्रामसेवक पी. व्ही. तळेले यांना जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी पाडळसे येथील प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे काम का करत नाही, अशी विचारणा केली. त्यावर तळेले यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे लाभार्थी निश्चित करण्यासाठी तलाठ्यांना सहकार्य म्हणून माहिती गोळा करण्याचे काम करतो. मात्र, ती माहिती अपलोड करून महसूल खात्याचे रेकॉर्ड अद्ययावत करण्याची जबाबदारी सर्वस्वी आपली नाही, असे उत्तर दिले. त्यावर जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी तळेले यांना एकेरी भाषेत शिवीगाळ व दमदाटी करत निलंबित करण्याची धमकी दिली.

या प्रकाराचा मन:स्ताप करून घेतल्याने तळेलेंची प्रकृती बिघडली. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, ग्रामसेवक संघटनेने या घटनेची लागलीच गांभीर्याने दखल घेतली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तळेले यांच्याबाबतीत घडलेल्या प्रकाराची कैफियत मांडली. जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळालेल्या वागणुकीचा निषेध नोंदविण्यासाठी गुरुवारपासून प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे काम बंद करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला.

ग्रामसेवक संघटनेचा महसूल विभागावर आरोप-

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या कामासाठी राज्यभरात महसूल खात्याकडून ग्रामसेवकांवर विनाकारण दडपण आणले जात आहे. या योजनेचा डाटा अपलोड करण्याची जबाबदारी नाहक ग्रामसेवकांवर ढकलली जात असल्याचा आरोप ग्रामसेवक संघटनेने केला आहे. प्रत्येक गावाची माहिती अद्ययावत ठेवण्याची पूर्ण जबाबदारी ग्रामसेवकाचीच आहे, अशी अपेक्षा महसूल खाते का ठेवत आहे? असा प्रश्नही ग्रामसेवकांच्या संघटनेने उपस्थित केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details