महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा; ठाकरेंचे भाजपला थेट आव्हान

महाविकास आघाडीचे सरकार फार काळ टिकणार नाही, अशी टीका भाजपकडून वारंवार करण्यात येत आहे. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी 'आमचं सरकार मजबूत आहे. तुमच्यात हिंमत असेल तर आमचं सरकार पाडून दाखवा', अशा शब्दात भाजपला आव्हान दिले.

By

Published : Feb 15, 2020, 8:39 PM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

जळगाव - विभिन्न विचारसरणी असलेले तीन पक्ष एकत्र येऊन स्थापन झालेले महाविकास आघाडीचे सरकार फार काळ टिकणार नाही, अशी टीका भाजपकडून सुरू आहे. या टीकेला शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरात जोरदार प्रत्युत्तर दिले. 'आमचं सरकार मजबूत आहे. तुमच्यात हिंमत असेल तर आमचं सरकार पाडून दाखवा', अशा शब्दात त्यांनी भाजपला खुले आव्हानच दिले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे भाजपला थेट आव्हान

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरात प्रथमच शिवसेना, राष्ट्रवादी तसेच काँग्रेसचा एकत्रित जाहीर शेतकरी मेळावा पार पडला. या मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. ठाकरेंसोबत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील उपस्थित होते. मेळाव्यात भाषण करताना उद्धव ठाकरेंनी भाजपचा खरपूस समाचार घेतला.

ते पुढे म्हणाले, राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या विकासाचा हेतू डोळ्यासमोर ठेऊन आम्ही एकत्र आलो. सरकारच्या कामकाजाला सुरुवात झाल्यावर विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून सतत टीका-टिप्पणी केली जात आहे. विभिन्न विचारसरणी असलेले तीन पक्ष एकत्र येऊन स्थापन झालेले महाविकास आघाडीचे सरकार किती दिवस चालेल. आम्ही लवकरच सत्तेत येऊ, असे भाजप नेते सांगत सुटले आहेत. मात्र, आम्ही एकत्र आहोत आणि आमचे सरकार मजबूत सरकार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

जनतेने तुम्हाला लोटलं ना...

एप्रिलनंतर 'ऑपरेशन लोटस' नावाची कोणती तरी मोहीम भाजप हाती घेणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, त्याने काहीएक फरक पडणार नाही. महाराष्ट्रातील जनतेने तुम्हाला बाजूला लोटले ना. आता काही झाले तरी जनता तुम्हाला परत दूर लोटल्याशिवाय राहणार नाही. महाविकास आघाडीचे सरकार हे 5 वर्षे पूर्ण करेल. आमचे सरकार मजबूत आहे. तुमच्यात हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा. उद्या कशाला आज नाही तर आत्ताच पाडून दाखवा. आम्ही सत्तेसाठी हापापलेलो नाही, अशा कडक शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजपचा समाचार घेतला.

आमचे सरकार सर्वसामान्यांचे सरकार-

महाविकास आघाडीचे सरकार हे सर्वसामान्य तसेच गोरगरीब जनतेचे सरकार आहे. आमचे सरकार आल्यानंतर संपूर्ण राज्यातील जनतेच्या मनात आनंद आहे. हे सरकार शेतकरी, सर्वसामान्य लोकांची आस्थेवाईकपणे चौकशी करणारे, त्यांचा कैवार असलेले सरकार आहे, असेही ठाकरे यावेळी म्हणाले.

खडसेंना चिमटा-

उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात भाजप नेते एकनाथ खडसेंना देखील चिमटे काढले. मुक्ताईनगरातील जनतेने विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराला पराभूत करून मुक्ताईनगरला खऱ्या अर्थाने मुक्त केले आहे, असे सांगत ठाकरेंनी खडसेंवर अप्रत्यक्षपणे त्यांच्याच मतदारसंघात टीका केली.

आम्ही काही त्यांचे गुलाम नव्हतो-

गेली 25 ते 30 वर्षे युतीच्या माध्यमातून ज्या भाजपसोबत आम्ही राहिलो, त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला नाही. आम्ही काही त्यांचे गुलाम नव्हतो. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्यावर विश्वास दाखवला. सत्ता स्थापनेपूर्वी एका राजकीय बैठकीत आमच्या विचारांमध्ये एकमत झाले, असे सांगत उद्धव ठाकरेंनी भाजपच्या कार्यपद्धतीवर टीका केली.

महाराष्ट्राला क्रमांक एकचे राज्य करायचे आहे - शरद पवार

महाराष्ट्र राज्याला देशातील क्रमांक एकचे राज्य बनवण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार कटिबद्ध आहे. महाराष्ट्र सक्षम व्हावा म्हणून अपूर्ण राहिलेली विकासकामे पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. आता केंद्रानेही राज्याला याकामी भरीव निधी देऊन मदत करण्याची गरज आहे. यापुढील काळात केवळ शेतीवर अवलंबून न राहता उद्योग-व्यवसायांकडे वळण्याची गरज आहे. जळगाव जिल्ह्यात कृषीसह औद्योगिक क्षेत्राचा विकास व्हावा, म्हणून शासनाने लक्ष देण्याची गरज आहे. महिला सबलीकरणासाठी बचत गटांना अल्पदरात कर्ज उपलब्ध करून दिले पाहिजे, असेही यावेळी शरद पवार म्हणाले.

या मेळाव्याला कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, कृषिमंत्री दादा भुसे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, मेळाव्याचे संयोजक आमदार चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.

हेही वाचा -शेतकऱ्यांना दिवसा विजेसह पाणी अन् हमीभाव देण्यासाठी प्रयत्न करू - उद्धव ठाकरे

हेही वाचा -'शेतकऱ्यांना सात-बारा घेऊन फिरण्याची गरज नाही, ऑनलाइन सात-बारा ग्राह्य ठरेल'

ABOUT THE AUTHOR

...view details