महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

किती शेतकरी कर्ज घेऊन बँकेत 'एफडी' करतात?; चंद्रकांत पाटलांचा अधिकाऱ्यांना वादग्रस्त सवाल

किती शेतकरी कृषी कर्ज घेऊन त्याची बँकेत ‘एफडी’ करतात, असा वादग्रस्त सवाल खुद्द राज्याचे महसूल तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला. ते दुष्काळाची पाहणी करण्यासाठी जळगावमध्ये आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कृषी आढावा बैठकीत त्यांनी हा वादग्रस्त सवाल  केल्यानंतर उपस्थित सर्वच अधिकारी अवाक् झाले होते.

By

Published : May 18, 2019, 11:29 PM IST

कृषी आढावा बैठकीत अधिकाऱ्यांसोबत चंद्रकांत पाटील

जळगाव- जिल्ह्यातील किती शेतकरी कृषी कर्ज घेऊन त्याची बँकेत ‘एफडी’ करतात, असा वादग्रस्त सवाल खुद्द राज्याचे महसूल तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला. ते दुष्काळाची पाहणी करण्यासाठी जळगावमध्ये आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कृषी आढावा बैठकीत त्यांनी हा वादग्रस्त सवाल केल्यानंतर उपस्थित सर्वच अधिकारी अवाक् झाले होते.


महसूलमंत्री असलेल्या चंद्रकांत पाटलांनी असा अजब सवाल करत दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया सर्वस्तरातून उमटत असून ते या वक्तव्यामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. चंद्रकांत पाटील हे शनिवारी दुष्काळी पाहणीसाठी जिल्हा दौऱ्यावर आले असताना, संध्याकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवनात त्यांनी कृषी आढावा घेण्यासाठी बैठक घेतली.


त्या बैठकीत त्यांनी आगामी खरीप हंगामासाठी कृषी विभागाने केलेल्या नियोजनाची माहिती घेण्यासह कृषी कर्ज, नाबार्डचे नियोजन या बाबींचाही आढावा घेतला. हा आढावा जाणून घेत असताना त्यांनी 'शेतकऱ्यांचे कर्ज घेण्याचे प्रमाण कमी झाले की नाही? जळगाव जिल्ह्यात असे किती शेतकरी आहेत, जे कर्ज घेऊन बँकांमध्ये ‘एफडी’ करतात', असा वादग्रस्त सवाल अधिकाऱ्यांना केला. त्यावर अधिकारी निरुत्तर झाले.


एकीकडे राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना कृषी कर्जासाठी हेलपाटे मारायला लावत आहेत. सोबतच जळगाव जिल्हा बँकेकडूनही शेतकऱ्यांना कृषी कर्ज देण्यात हात आखडता घेतला जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. अशा विपरीत परिस्थितीत पालकमंत्री, असे वक्तव्य करत असतील तर शेतकऱ्यांनी काय करावे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details