महाराष्ट्र

maharashtra

वरणगाव नगरपालिकेतील भाजपचे ५ नगरसेवक अपात्र; खडसे गटाला जबर धक्का

By

Published : Sep 13, 2019, 10:43 PM IST

जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्यांचे २ गट पडले असून दोन्ही गटांकडून नेहमी एकमेकांवर कुरघोड्या सुरू असतात. तर, वरणगाव नगरपालिकेतही असाच काहिसा प्रकार घडला आहे. अडीच वर्षांपूर्वी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीवेळी महाजन समर्थक असलेल्या गटनेत्याने काढलेला व्हीप झुगारल्याने खडसे गटाचे ५ नगरसेवक अपात्र झाले असून हा खडसे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.

वरणगाव नगरपालिकेतील भाजपचे ५ नगरसेवक अपात्र

जळगाव - भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यातील हाडवैर सर्वश्रुत आहे. दोघांमधील वर्चस्ववादामुळे जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्यांचे २ गट पडले आहे. दोन्ही गटांकडून नेहमी एकमेकांवर कुरघोड्या सुरू असतात. तर, वरणगाव नगरपालिकेतही असाच काहिसा प्रकार घडला आहे. अडीच वर्षांपूर्वी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीवेळी महाजन समर्थक असलेल्या गटनेत्याने काढलेला व्हीप झुगारल्याने खडसे गटाचे ५ नगरसेवक अपात्र झाले आहे. हा खडसे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.

वरणगाव नगरपालिकेतील भाजपचे ५ नगरसेवक अपात्र


औरंगाबाद खंडपिठाच्या निर्णयानंतर जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी हा निकाल दिला आहे. अपात्र झालेल्या नगरसेवकांमध्ये खडसे गटाचे अरुणा इंगळे, रोहिणी जावळे, जागृती बढे, नितीन माळी आणि विकीन भंगाळे यांचा समावेश आहे. १८ पैकी ८ नगरसेवक असलेल्या भाजपने अपक्षांच्या मदतीने वरणगाव नगरपालिकेची सत्ता काबीज केली आहे.

हेही वाचा - गिरीश महाजनांचे जेवढं वय, तेवढा शरद पवारांचा राजकारणात अनुभव - रवींद्र पाटील


यानंतर दुसऱ्या अडीच वर्षांसाठी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपमध्ये २ गट पडले होते. २७ नोव्हेंबर २०१७ ला निवड प्रक्रिया असल्याने भाजपचे गटनेते सुनील काळे यांनी २३ नोव्हेंबर २०१७ ला नगराध्यक्षपदासाठी स्वतःचा तर, उपनगराध्यक्ष पदासाठी शेख अखलाक यांच्या मतदानासाठी भाजपच्या नगरसेवकांना व्हीप बजावला होता. मात्र, व्हीप काढताना विश्वासात घेतले नाही, म्हणून भाजपचे दुसरे नगरसेवक नितीन माळी, रोहिणी जावळे, अरुण इंगळे, जागृती बढे तसेच विकीन भंगाळे यांनी गटनेता बदलीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता. त्यांच्या शिफारशीनुसार नितीन माळी गटनेते झाले. माळी यांनी नगराध्यक्ष पदासाठी रोहिणी जावळे तर उपनगराध्यक्ष पदासाठी गणेश धनगर यांना मतदानाचा हक्क बजावला. प्रत्यक्षात मतदानावेळी भाजपच्या ८ पैकी तिघांनी सुनील काळे यांना तर ५ नगरसेवकांनी रोहिणी जावळे यांना मतदान केले. परंतु, अपक्ष व राष्ट्रवादीच्या मदतीने सुनील काळे यांना ११ तर रोहिणी जावळे यांना भाजपची ५ आणि अपक्षांची ३ अशी ८ मते पडली. त्यामुळे काळे नगराध्यक्ष झाले.


या निवडणुकीनंतर गटनेते नितीन माळी यांनी व्हीप झुगारणाऱ्या सुनील काळे यांच्यासह त्यांना मतदान करणाऱ्या भाजपच्या तिघांविरुद्ध अपात्रतेची तक्रार केली. तर, सुनील काळे यांनी देखील त्यांच्या विरोधात असलेल्या ५ जणांच्या अपात्रतेची तक्रार दाखल केली होती. हे प्रकरण पुढे खंडपिठाने जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवले. या सुनावणीअंती खडसे समर्थक असलेले नगरसेवक अपात्र झाले आहेत.

हेही वाचा - विरोधक वैफल्यग्रस्त अन् निराश; वशीकरणाच्या टीकेवर गिरीश महाजनांचा शेरोशायरीतून चिमटा

महाराष्ट्र पक्षांतर बंदी अधिनियम १९८६ अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांनी खडसे गटाच्या ५ नगरसेवकांना अपात्र ठरवले आहे. या आदेशाची प्रत वरणगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना प्राप्त झाली आहे. त्यानुसार रिक्त झालेल्या पाचही पदांबाबतची माहिती नगरपालिकेकडून राज्य निवडणूक आयोगाला पाठविण्यात येणार आहे. दरम्यान, वरणगाव नगरपालिकेचा कार्यकाळ आता अवघे ८ महिने शिल्लक राहिला आहे. त्यातही विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते. त्यामुळे पोटनिवडणूक होईल की नाही, हे निश्चित नाही.


तर, एकनाथ खडसेंची पक्षात घुसमट सुरू असून गिरीश महाजन यांना वेळोवेळी बळ देऊन पक्षाकडून खडसेंचे खच्चीकरण केले जात असल्याची भावना खडसे समर्थकांमध्ये आहे. वरणगाव नगरपालिकेत घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

हेही वाचा - राज्यातील मोठ्या धरणांमधील गाळ काढणार; जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची माहिती

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details