महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 24, 2021, 1:38 PM IST

Updated : May 24, 2021, 7:17 PM IST

ETV Bharat / state

जलवाहिनीच्या कामामुळे ४८ कासवांचा मृत्यू, उष्णतेने दगावल्याचा वनविभागाचा दावा

ममुराबाद व परिसरातील शेतीसाठी बळीराजा योजनेंतर्गत पाणी देण्यासाठी जलवाहिनीचे काम सुरू आहे. यासाठी असोदा ते आव्हाणे रस्त्यावर खोदकाम करुन लवकी हा नाला वळविल्याने त्यातील काही कासव पाण्याबाहेर आले व ते जलवाहिनीत गेले. उन्हामुळे लोखंडी जलवाहिनी प्रचंड तापलेली असते आणि त्यात तिला वेल्डिंग केले जात असल्याने उष्णतेमुळे कासव मृत्युमुखी पडले.

४८ कासवांचा मृत्यू
४८ कासवांचा मृत्यू

जळगाव-जलवाहिनीच्या कामासाठी नाला वळविल्याने, नाल्यातील अनेक कासव बाहेर येऊन लोखंडी जलवाहिनीत (खुल्या पाईपात) गेले आणि तेथे प्रचंड उष्णतेमुळे त्यांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना जळगाव तालुक्यातील असोदा गावाजवळील लवकी नाल्यात घडली. यात ४८ कासव मृत्यूमुखी पडल्याचे आढळून आले. त्याचा वनविभागाने पंचनामा केला आहे. या प्रकारामुळे पर्यावरणप्रेमी संतप्त झाले असून, जलवाहिनीचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाईची मागणी होत आहे. ममुराबाद व परिसरातील शेतीसाठी बळीराजा योजनेंतर्गत पाणी देण्यासाठी जलवाहिनीचे काम सुरू आहे. यासाठी असोदा ते आव्हाणे रस्त्यावर खोदकाम करुन लवकी नाल्याला वळविण्यात आले आहे, हा नाला वळविल्याने त्यातील काही कासव पाण्याबाहेर आले व ते जलवाहिनीत गेले. उन्हामुळे लोखंडी जलवाहिनी प्रचंड तापलेली असते आणि त्यात तिला वेल्डिंग केले जात असल्याने उष्णतेमुळे कासव मृत्यूमुखी पडले.

इंडियन फ्लॅपशेल जातीचे कासव

याप्रकरणी वनविभागाच्या वतीने वनरक्षक अश्विनी ठाकरे, डी. डी. पवार, रेवन चौधरी, सुनीत बाविस्कर, असोद्याचे पोलीस पाटील आनंदा बिऱ्हाडे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. वनपरिक्षेत्र अधिकारी समाधान पाटील, वनपाल पी. जे. सोनवणे यांच्यामार्फत पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. त्याठिकाणी ४८ मृत कासव आढळल्याचे पंचनाम्यात म्हणले आहे. इंडियन फ्लॅपशेल जातीचे हे कासव असून, मृत कासवांना जाळून नष्ट केले जाणार आहे. नाल्यातून बाहेर आल्याने व उन्हाच्या तीव्रतेने कासवांचा मृत्यू झाल्याचे वन विभागाचे म्हणणे आहे.

ठेकेदाराची असंवेदनशीलता
मृत कासवे तशीच ठेवून ठेकेदाराने असंवेदनशीलता दाखवली आहे. वास्तविक हा अपघात नसून, हत्या आहे. त्या कासवांना पुन्हा नाल्यात पाठवता आले असते, पण कोणी काहीच केले नाही. दोषीवर योग्य ती कारवाई व्हावी, अशी मागणी असोदा येथील नवनिर्मिती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष किशोर चौधरी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केली.

हेही वाचा-LIVE : भाजपा नेते किरीट सोमय्या यांची रत्नागिरीतून पत्रकार परिषद

Last Updated : May 24, 2021, 7:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details