महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पाण्याच्या माध्यमातून आजेगावचे खरे राजकारण आले समोर

मागील अनेक दिवसांपासून आजेगाव येथील महिला पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामपंचायतीवर मोर्चे काढत आहेत. मात्र, ग्रामपंचायत काहीच दखल घेत नसल्याने महिलांनी बुधवारी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला. यावेळी ग्रामसेवक हजर नसल्याने महिलांनी ग्रामपंचायतीला कुलूप ठोकून 'आम्हाला पाणी मिळत नाही, तोपर्यंत आम्ही या ग्रामपंचायती समोरून हलणार नाही' असे सांगितले.

By

Published : Jul 17, 2019, 3:22 PM IST

आजेगाव

हिंगोली - तसे आजेगाव चे राजकारण हे जुनेच! मात्र, आज पाण्यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनामुळे त्या राजकारणाला खरोखर उजाळा मिळाला आहे. जिल्ह्यात पाऊसच नसल्याने आजेगाव सारखीच परिस्थिती जिल्ह्यातील इतर गावात निर्माण झाली आहे. आजेगावच्या महिलांनी यापूर्वी मोर्चा काढून पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी ग्रामपंचायतीला केली होती. मात्र, ग्रामपंचायतीने त्याची काहीच दखल न घेतल्याने, बुधवारी पुन्हा महिलांनी एकत्र येत मोर्चा काढला. तर याठिकाणी ग्रामपंयाचतीच्या दोन्ही पॅनलमध्ये वेगळेच चित्र दिसून आले. त्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांनी (बीडीओ) बुधवारी गावात धाव घेऊन महिलांची कैफियत ऐकून घेतली.

महिलांचा पाण्यासाठीचा आटापिटा


हिंगोली जिल्ह्यात आज घडीला केवळ 14 टक्के पाऊस झाल्यामुळे पाणीटंचाईचे भयंकर वास्तव निर्माण झाले आहे. पावसाअभावी पिके पूर्णत: करपून गेली असून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट तर पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मागील अनेक दिवसांपासून आजेगाव येथील महिला पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामपंचायतीवर मोर्चे काढत आहेत. मात्र, ग्रामपंचायत काहीच दखल घेत नसल्याने महिलांना रात्री-बेरात्री पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. आज घडीला आजगाव येथे पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत पूर्णता कोरडेठाक झालेल्या स्थितीत आहेत. त्यामुळेच महिलांनी एकत्र येत बुधवारी ग्राम पंचायतीवर मोर्चा काढला. ग्रामसेवक हजर नसल्याने महिलांनी ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले. सरपंच आणि उपसरपंच यांचे दोन्ही गट समोरासमोर येत, आपापसात शिवीगाळ करत होते. सरपंचाच्या गटाने तर उपसरपंचावर चक्क महिला समोरच शिव्यांची लाखोली वाहिली. तेव्हा कुठे आजच्या परिस्थितीने आजेगाव ग्रामपंचायतीच्या राजकारणाचे बिंग फुटले.

आजेगावात पाण्याचे राजकारण पेटले


'आम्हाला पाणी मिळत नाही, तोपर्यंत आम्ही या ग्रामपंचायती समोरून हलणार नाही' असा पवित्रा महिलांनी घेतल्यामुळे सरपंच व सरपंचाचे पॅनल पूर्णतः हादरून गेले होते. बराच वेळ हा वाद सुरू होता. ही बाब सेनगावचे बीडीओ यांना समजली, त्यांनी तत्काळ सहायक बीडीओ पंडित यांना घटनास्थळी रवाना केले. तर महिलांनी पंडित यांच्यासमोर समस्यांचा पाढाच वाचला. तेव्हा मात्र सरपंच आणि उपसरपंच हे दोन्ही गट एकमेकांकडे एक टक पाहात होते. '' सांगा साहेब हाताला काम नाही आणि अशा परिस्थितीमध्ये दोनशे रुपयाला दोनशे लिटर पाणी विकत घ्यावे लागत आहे'' अनेकदा हा प्रश्न ग्रामपंचायतीच्या लक्षात आणून देण्याचा आम्ही प्रयत्न केला, मात्र एकदाही आम्हाला त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही, अशी बाब महिलांनी अधिकाऱ्यांपुढे मांडली.

आता बीडीओ काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. तर आंदोलक महिलांसमोर सुरू केलेल्या शिव्यांच्या लाखोलीवरही बीडीओ, काय कारवाई करणार अन पाण्याचा प्रश्न कसा सोडणार याकडे लक्ष लागले आहे.

बऱ्याच महिला जेव्हा त्यांच्या समस्या सांगत होत्या, तेव्हा बीडीओंच्या अवती भोवती घिरट्या घेणारे, सरपंच, उपसरपंच व सदस्य कोणती महिला समस्येचा पाढा वाचतेय याकडे ही बारीक लक्ष ठेऊन होते. एकंदरीत पाणी मागणीच्या आंदोलनाने मात्र या ग्रामपंचायतीचा राजकीय स्टंट बाजी अन् खोटारडेपणा मतदार महिलांसमोर उघड झाला आहे. आपण ग्रामपंचायतीला मतदान करून निवडून आणलेल्या उमेदवारांकडून अपेक्षांचा पूर्णत: भंग होत असल्याने महिलांना मतदान केल्याचा पश्चाताप होत होता.

ABOUT THE AUTHOR

...view details