महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पोलीस पाटील बहिणीच्या गैरहजरीत भाऊच बघायचा सर्व कामे; गैरप्रकार उघड, पाटलीनबाईवर निलंबनाची कारवाई - पोलीस पाटलाचा गैरप्रकार हिंगोली

पोलीस पाटील असलेली महिला लग्न करून सासरी गेली, अन् तिचा कारभार भाऊ करत असल्याचे कोरोनाच्या परिस्थितीत उघड झाले. या महिला पोलीस पाटीलला गैरहजर असल्याबाबत प्रश्न विचारले असता वरिष्ठांना उद्धट उत्तरे देत असल्याचा अहवाल पोलिसांनी दिला. त्यानंतर उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांनी तडकाफडकी निलंबनाची कारवाई करत 24 तासात खुलासा मागविला आहे.

पाटलीणबाईवर कारवाई
पाटलीणबाईवर कारवाई

By

Published : Apr 29, 2020, 9:56 AM IST

हिंगोली - सध्या कोरोनामुळे प्रशासन जीव ओतून काम करत आहे. आशा परिस्थितीत सर्वांनाच जबाबदाऱ्या देखील दिल्या आहेत. मात्र, एका गावात चक्क पोलीस पाटील असलेली महिला लग्न करून सासरी गेली, अन् तिचा कारभार भाऊ करत असल्याचे कोरोनाच्या परिस्थितीत उघड झाले. नेहमीच गैरहजर असलेल्या महिला पोलीस पाटीलला उपस्थित राहत नसल्याबाबत प्रश्न विचारले असता वरिष्ठांना उद्धट उत्तरे देत असल्याचा अहवाल पोलिसांनी दिला. त्यानंतर उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांनी संबधीत पोलीस पाटील महिलेला तडकाफडकी निलंबीत केले. शिवाय 24 तासात खुलासा मागविला आहे. तरन्नुम सल्लातुला शेख, रा. कळमकोंडा ता. कळमनुरी असे या महिला पोलीस पाटीलचे नाव आहे.

माहितीनुसार, तरन्नुम शेख यांची 2019 मध्ये कळमकोडा येथे पोलीस पाटील म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, 2020 मध्ये तिचा विवाह होऊन ती आपल्या सासरी परभणी येथे राहत होती. तर इकडे त्यांच्या अनुपस्थित त्यांचा भाऊ पोलीस पाटलाचा कारभार बघत असे. वास्तविक पाहता पोलीस पाटील हे मुळात ग्रामस्थ अन् प्रशासन यांच्यातील दुवा आहे. मात्र, ही महिला पोलीस पाटील, बिट जमादार किंवा कोणत्याही प्रशासकीय अधिकारी असे कुणालाही गेल्या चार महिन्याच्या काळात भेटली नाही. एवढेच नव्हे तर ती ग्रामस्थांना देखील प्रमाणपत्र घेण्यासाठी परभणी येथे बोलावत असे. तसेच, ग्रामपंचायतमध्ये ज्यांना-ज्यांना प्रमाणपत्र हवे असेल त्यांची प्रमाणपत्र ठेवायला सांगून आल्यानंतर स्वाक्षरी करून देते, असा राजेशाही थाट सुरू होता. या प्रकाराला ग्रामस्थ हैराण झाले होते. मात्र, तेव्हा कोणी तेवढे गांभीर्याने घेतले नव्हते.

दरम्यान, हिवराबेल येथे एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर आजूबाजूची सर्व गावे सील करण्यात आली. या गावत जेव्हा पोलीस अधिकारी पोहोचले तेव्हा पोलीस पाटील नव्हे. तर त्यांचा भाऊच काम पाहत असल्याचा अजब प्रकार उघड झाला. अधिकाऱ्याने त्या भावाकडेही पोलीस पाटील यांची विचारणा केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. तसेच पोलीस पाटील महिलेला विचारणा केली तर तुम्ही कोण मला विचारणार, असा उलट सवाल पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांना केला. त्यानंतर त्यांच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई करण्यात आली.

या कारवाईने जिल्ह्यातील कामचुकार पोलीस पाटलांचे धाबे दणाणले आहेत. सद्या आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असून ग्रामस्तरीय व इतर यंत्रणा व्यवस्थित काम करत आहे. मात्र, असे काही पोलीस पाटील असल्याने, प्रशासनाला अनेक अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे, प्रशासनाच्या निर्देशांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्याचा इशारा उपविभागीय अधिकारी चोरमारे यांनी दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details