हिंगोली -जिल्ह्यातील ब्राह्मणवाडा येथील दोन ऊसतोड कामगारांचे अपहरण झाल्याची घटना दोन आठवड्यांपूर्वी घडली. यातील एकजण कसा बसा जीव वाचावून आपल्या गावी परतला आहे. या प्रकरणात अपहरण झालेल्या व्यक्तीच्या पत्नीने गोरेगाव पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देऊन पाच दिवस उलटले तरीही कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता. ही बाब वरिष्ठांच्या लक्षात आणून दिल्यानंतर अखेर गुन्हा दाखल झाला आहे. अपहरण झालेल्या व्यक्तीची सुटका करण्यासाठी व आरोपीला ताब्यात घेण्यासाठी एक पथक रवाना झाल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक गजानन पाटील यांनी दिली.
हिंगोलीतून दोन ऊसतोड कामगारांचे अपहरण - हिंगोली ऊसतोड कामगार न्यूज
दोन दिवसांपूर्वी ऊस तोडणीसाठी घेतलेली उचल परत देऊ शकत नसलेल्या एका ऊसतोड कामगाराचे अपहरण झाल्याची घटना बीडच्या गेवराई तालुक्यात घडली. त्यानंतर पुन्हा असाच एक प्रकार समोर आला आहे. हिंगोलीतूनही दोन कामगारांचे अपहरण झाले आहे.

सुटका करून आलेल्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, अपहरणकर्त्यांनी 21 सप्टेंबरला दोन ऊसतोड कामगारांना लाल रंगाच्या गाडीमध्ये घालून सोलापूर जिल्ह्यातील मेसगव्हाण येथे घेऊन गेले. त्यांना तिथे मारहाण केली. ते स्वत:चा जीव वाचवून पळून येण्यात यशस्वी झाले मात्र, त्यांच्या सोबत असलेल्या कामगाराला ते बाहेर काढू शकले नाही. गावी आल्यानंतर त्यांनी मागे राहिलेल्या कामगाराच्या नातेवाईकांना व पत्नीला याची माहिती दिली.
पत्नीने लागलीच गोरेगाव पोलीस ठाण्यामध्ये धाव घेऊन या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. मात्र, पाच दिवस उलटले तरीही पोलीस कोणताही गुन्हा दाखल करण्यासाठी पुढाकार घेत नव्हते. शेवटी पीडित कुटुंबाने उपविभागीय पोलीस अधिकारी यतीश देशमुख यांच्याकडे धाव घेतली. देशमुख यांनी गोरेगाव पोलीस ठाण्याशी संपर्क करून, या प्रकरणाकडे लक्ष देण्याची सूचना केली.