हिंगोली - जिल्ह्यात १० दिवसांपासून पावसाचा कहर सुरूच आहे तर ३ दिवसांपासून वाघाच्या दहशतीने गावकऱ्यांचा जीव वेठीस आला आहे. या दोन्ही संकटाने जिल्ह्यातील शेतकरी अक्षरशः भयभीत झाले आहेत. जनावरांवर हल्ला करणारा वाघ आता थेट माणसांवर हल्ला करीत असल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशत वाढली आहे. या वाघाने सुकळी येथील ५ शेतकऱ्यांवर तर मन्नास पिंपरी परिसरातील एका हरणारावर हल्ला केला आहे. वनविभाग या वाघाच्या लहान सहान हालचालीवर लक्ष ठेवून असले तरी अजूनपर्यंत वाघाला ताब्यात घेण्यात आलेले नाही. मात्र, पहिल्यांदाच जिल्ह्यात आलेल्या वाघामुळे वनविभागासह नागरिकांची झोप उडाली आहे.
जिल्ह्यात रात्री अपरात्री पाऊस हजेरी लावत असून दिवसा उघडीप देत आहे. त्यामुळे शेतकरी जमेल तशी भिजलेली सोयाबीन वाळवून टाकण्याचा प्रयत्न करीत असून पशुपालक आपली जनावरे नेहमीप्रमाणे जंगल परिसरात चरण्यासाठी नेत आहेत. मात्र गेल्या ३ दिवसांपासून दाखल झालेल्या वाघामुळे शेतकऱ्यांचे नियोजनच बिघडल्याचे चित्र आहे. तर, दुसरीकडे पावसामुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट आल्याने बळीराजावर मोठे संकट ओढावले आहे. या दोन्हींचा सामना करता-करता जिल्ह्यातील शेतकरी मेटाकुटीस आले आहेत.