हिंगोली - हैदराबाद दक्षिण-मध्ये रेल्वे विभागाचे महाप्रबंधक गजानन माल्या गुरुवारी अकोला ते पूर्णा रेल्वे मार्गाची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर आले होते. त्यामुळे अधिकारी-कर्मचारी दोन दिवसांपासून अहोरात्र परिश्रम करून रेल्वे पुलाखाली साचलेले पाणी घाई गडबडीत मजुरांकडून टोपल्याने उपसवत शाबासकी मिळविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले.
हिंगोली तालुक्यातील माळशिरस येथे असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाखाली रिसोड ते हिंगोली मार्गे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. ही समस्या गेल्या अनेक वर्षापासून आमदार तानाजी मुटकुळे यांनी रेल्वे विभागाकडे मांडली होती. त्यामुळे रेल्वे विभागाने ही समस्या सोडविण्यासाठी पुलाच्या अवतीभवती जेसीबीच्या सहाय्याने नाल्या करून पुलाखाली साचणारे पाणी काढून दिले. तर नालीद्वारे न गेलेले पाणी रेल्वे अधिकाऱ्यांनी मजुरांना टोपलीच्या सहाय्याने बसण्यास सांगितले. त्यामुळे रेल्वे अधिकाऱ्यांची शाबासकी मिळविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले.
मालसेलु येथे भेट देताच आमदार तान्हाजी मुटकुळे व कार्यकर्त्यांनी प्रबंधक यांचे स्वागत केले. महाप्रबंधकांनी पूर्णा ते अकोला महामार्गाची पाहणी केली. दरम्यान, ते बार्शी येथे उतरणार असल्याने रेल्वे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अहोरात्र परिश्रम घेऊन एका रात्रीतून रेल्वे उड्डाणपुलाखाली पाणी व रेल्वे रुळाच्या आजुबाजूला साफ सफाई करून घेतली होती. मात्र, हे काम नुकतेच झाल्याचे महाप्रबंधक यांच्या लक्षात आले होते. त्यांनी अजून काही सूचना देत ग्रामस्थांचेही म्हणणे ऐकून घेतले.
माळसेलु येथे रेल्वे स्थानकापासून गावापर्यंत रस्त्याची केली मागणी -
हिंगोली तालुक्यातील माळसेलु येथे रेल्वे स्थानकापासून एक किमी अंतरावर असलेल्या गावापर्यंत आरसीसी रस्त्याचे बांधकाम रेल्वे विभागाने करून द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. या मागणीचे निवदेन महाप्रबंधक यांना देण्यात आले. यावेळी सरपंच राजेंद्र पाटील, माजी सरपंच डॉ. भानुदास वामन, कैलास देशमुख, ग्रामसदस्य संतोष भिसे, यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, रस्त्याअभावी होत असलेल्या अडचणी तसेच दुर्घटना यासंदर्भात सरपंच राजेंद्र पाटील व डॉ. भानुदास वामन यांनी महाप्रबंधक यांच्याकडे व्यथा मांडल्या. यावर रस्त्याचे काम करण्यासंदर्भात रेल्वे महाप्रबंधक यांनी आश्वासन दिले.
हेही वाचा -डॉक्टर नव्हे सैतान... इस्लामपूरमध्ये मृतदेहावर केले तब्बल २ दिवस उपचार