महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अपूर्ण घरकुलामुळे उकिरड्यावर काढतात दोन बहिणी रात्र; कळमनुरीतील विदारक चित्र

कळमनुरी तालुक्यात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सन २०१८-१९ या वर्षात १७८ घरकुल मंजूर झाली आहेत. या घरकुलांसाठी लागणाऱ्या निधीचा दुसरा, तिसरा हप्ता अद्याप न मिळाल्याने घराचे बांधकाम अर्ध्यावर अटकून लाभार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

By

Published : Dec 31, 2019, 10:25 AM IST

Updated : Dec 31, 2019, 5:20 PM IST

hingoli
कळमनुरीतील विदारक चित्र

हिंगोली - एकही बेघर राहू नये म्हणून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करून दिले. मात्र, घराच्या बांधकामाकरता लागणाऱ्या निधीचा कसा बसा पहिला अन् दुसरा हप्ता मिळाला. तर, उर्वरित काम पूर्ण करण्याकरता अनेकदा कार्यालयात खेटे घेऊनही तिसरा हप्ता पदरात न पडल्याने शेवटी शेख परवीन या महिलेला आपल्या बहिणीसह उकिरड्यावर राहण्याची भयंकर वेळ येऊन ठेपली आहे.

घरकुल योजनेतील अपूर्णावस्थेत असलेले घर

जिल्ह्यातील एकट्या कळमनुरी तालुक्यात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सन २०१८-१९ या वर्षात १७८ घरकुल मंजूर झाली आहेत. या घरकुलांसाठी ४ कोटी ४५ लाख इतक्या निधीची गरज असताना आत्तापर्यंत ७१ लाख २० हजारांचा पहिला टप्प्यातील निधी मंजूर झाला. अन् ७१ लाख लाभार्थ्यांना घरकुलाचा हप्ता देण्यात आला. सध्या स्थितीत फक्त २० हजार रुपये खात्यात जमा असून दुसऱ्या हप्त्यासाठी १ कोटी ६ लाख ८० हजार रुपयांची गरज असल्याची माहिती नगरपालिकेचे अधीक्षक डी.ए गव्हाणकर यांनी दिली.

कळमनुरी येथील शेख परवीण यांच्या घराचे बांधकाम हे अंतिम टप्यात आले आहे. यासाठी जवळ दमडीही नसल्याने या लाभार्थी महिलेने निधीसाठी अनेकदा नगरपालिकेच्या पायऱ्या झिजविल्या आहेत. मात्र, त्यांना प्रत्येक फेरीमध्ये वरून निधीच आलेला नसल्याचे सांगितले जाते. घर बांधायला काढल्यामुळे घराजवळ असलेल्या उकिरड्याच्या जागेत या महिलेने आपले बस्तान थाटले आहे. साधे उभे राहायला देखील जागा नसलेल्या ठिकाणी ही महिला आपल्या बहिणीसह येथे वास्तव्य करत आहे. तर, जवळूनच वाहत असलेल्या नालीच्या पाण्यामुळे सध्या राहत असलेल्या घरात ओल फुटल्याने मोठी पंचायत निर्माण झाली आहे. अशा भयंकर परिस्थितीत आज न उद्या निधी मिळेल आणि घराचे बांधकाम पूर्ण होईल, याच प्रतीक्षेत परवीन दिवस ढकलत आहे.

हेही वाचा - दुचाकी आणि पिकअपच्या धडकेत एक ठार, औंढा नागनाथजवळील घटना

ही परिस्थिती केवळ कळमनुरी येथील परवीन शेखचीच नव्हे तर, जिल्ह्यातील या योजनेच्या अनेक लाभार्थ्यांची आहे. याला कंटाळून सेनगाव येथील एका लाभार्थ्यांने नगरपंचायतकडे आत्महत्या करण्याची परवानगीच मागितली होती, त्यामुळे खळबळ उडाली. हीच अवस्था अनेकांची झाली आहे. अजून निधीच्या प्रतीक्षेत किती दिवस आशा बाळगत लाभार्थी हातावर हात धरून बसणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, कळमनुरी येथील शेख परवीन यांची घराविना होणारी परवड खरोखरच मन हेलावून टाकणारी आहे. मात्र, जिल्ह्यातील कितीतरी लाभार्थी अद्याप निधीच्या प्रतीक्षेत आहेत.

हेही वाचा -विहिरीत आढळला तरुणाचा मृतदेह; खून झाल्याचा नातेवाईकांचा संशय

Last Updated : Dec 31, 2019, 5:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details