महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

निम्म्याहून अधिक भरलेल्या परभणीच्या येलदरी धरणाला गळती; परिसरात भीतीचे वातावरण

येलदरी धरणाच्या जलविद्युत केंद्रा जवळील दगडी भिंतींना पाझर फुटले आहेत. तीन ते चार ठिकाणी भगदाड पडले असून त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे. हे भगदाड मोठे झाल्यास त्यातून प्रचंड प्रमाणात पाणी वाहून पूर्णा नदीच्या पात्रात पूर येण्याची शक्यता आहे.

By

Published : Nov 2, 2019, 3:00 PM IST

निम्म्याहून अधिक भरलेल्या परभणीच्या येलदरी धरणाला भगदाड

परभणी - गेल्या सहा वर्षात पहिल्यांदाच निम्म्याहून अधिक (58 टक्के) भरलेल्या येलदरी धरणाला अक्षरश: भगदाड पडले आहेत. यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असून धरण फुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून काही अनर्थ झाल्यास याचा फटका परभणीसह हिंगोली आणि नांदेडला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन तत्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे.

निम्म्याहून अधिक भरलेल्या परभणीच्या येलदरी धरणाला भगदाड

हेही वाचा - 'तिढा सुटे पर्यंत अनिल कपूरला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करा'

मराठवाड्याचे भगिरथ म्हणून ओळखले जाणारे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या प्रयत्नातून 1958 ते 1968 या दहा वर्षाच्या कालावधीत बांधण्यात आलेले येलदरी धरण मराठवाड्यातील दुसऱ्या क्रमांकाचे धरण आहे. हे धरण यापूर्वी अनेक वेळा तुडुंब भरले आहे. परंतु, 2013 पासून हे धरण एकदाही भरले नाही. परिणामी या धरणात पाणीसाठा फार कमी शिल्लक होता. परंतु यावर्षी झालेल्या परतीच्या पावसात खडकपूर्णा धरणाचे दरवाजे उघडल्याने येलदरी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाली. गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे हे धरण तब्बल 58 टक्के भरले आहे. अजूनही अवकाळी तथा परतीचा पाऊस सुरूच असल्याने हे धरण आणखीन भरण्याची शक्यता आहे.

धरणाच्या जलविद्युत केंद्र जवळील दगडी भिंतींना पाझर फुटले आहेत. तीन ते चार ठिकाणी भगदाड पडले असून त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे. हे भगदाड मोठे झाल्यास त्यातून प्रचंड प्रमाणात पाणी वाहून पूर्णा नदीच्या पात्रात पूर येण्याची शक्यता आहे. असे झाल्यास याचा फटका परभणी जिल्ह्यासह हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील भागाला देखील बसणार आहे. ज्यामुळे लाखो हेक्टर जमीन बाधित होऊ शकते. अनेक गावांना पुराचा धोका पोहोचून मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मराठवाड्यातील महत्त्वाच्या धरणांपैकी दुसरे धरण असलेल्या येलदरी धरणाला मात्र पूर्णवेळ मुख्य अधिकारी नाहीत. त्यामुळे या ठिकाणची नियमित कामे होत नाहीत. धरणाची वार्षीक दुरुस्ती, देखभाल, सुरक्षा ही देखील रामभरोसे आहे. आज घडीला धरणाचा कारभार केवळ पाच कर्मचाऱ्यांवर अवलंबून आहे. गेल्या अनेक दशकांपासून उभे असलेल्या या धरणाच्या दुरुस्ती आणि डागडुजीकडे संबंधित विभागाने कायम दुर्लक्ष केले आहे. आता देखील मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असताना सुद्धा कुठल्याही अधिकाऱ्याने भेट देऊन दुरुस्ती संबंधीच्या कामांना सुरुवात केलेली नाही. त्यामुळे शेतकरी प्रचंड संताप व्यक्त करू लागले आहेत.

हेही वाचा - सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे - सदाभाऊ खोत

ABOUT THE AUTHOR

...view details