महाराष्ट्र

maharashtra

हिंगोलीत भूकंपाचे सौम्य धक्के, 3.4 रिश्टर स्केल तीव्रता

By

Published : Jun 2, 2020, 1:54 PM IST

अगोदरच कोरोनासारख्या आजाराच्या विळख्यात सापडलेले हिंगोलीवासीय नागरिकांमध्ये आज सकाळी झालेल्या भूकंपाच्या धक्क्याने भीतीचे वातावरण होते. जिल्ह्यात झालेल्या भूकंपाची 3. 4 एवढी रिश्टर स्केलवर नोंद झाली आहे. हा धक्का सौम्य असला तरी औंढा नागनाथ तालुक्यातील बऱ्याच गावातील नागरिक चांगलेच भयभीत झाल्याचे दिसून आले.

हिंगोलीत भूकंपाचा धक्का
हिंगोलीत भूकंपाचा धक्का

हिंगोली -अगोदरच कोरोनासारख्या आजाराच्या विळख्यात सापडलेले हिंगोलीवासीय नागरिकांत आज सकाळी झालेल्या भूकंपाच्या धक्क्याने भीतीचे वातावरण होते. जिल्ह्यात झालेल्या भूकंपाची 3. 4 एवढी रिश्टर स्केलवर नोंद झाली आहे. हा धक्का सौम्य असला, तरी औंढा नागनाथ तालुक्यातील बऱ्याच गावातील नागरिक चांगलेच भयभीत झाल्याचे दिसून आले.

जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी, औंढा, नागनाथ तालुक्यात अधून-मधून भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून हे सुरू आहे. आज पहाटे सव्वासातच्या सुमारास या भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील तीन ते चार वर्षांपासून या भागात जमिनीतून आवाज येणे सुरू आहे. याची भूवैज्ञानिकाने तपासणी देखील केली. मात्र, हा आवाज नेमका कशाचा आहे, हे अजूनही कळलेले नाही. या आवाजाची या भागातील ग्रामस्थांना जणू सवयच होऊन बसली आहे. आवाज आला तिथे घराच्या बाहेर नागरिक धाव घेतात. कित्येक वेळा वसमत, औंढानागनाथ, कळमनुरी तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांनी रात्र-रात्र जागून काढलेली आहे. आज पहाटे भूकंप झाल्याची माहिती मिळताच जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, प्रवीण फुलारी, तहसीलदार कैलाशचंद्र वाघमारे, पांडुरंग माचेवाड, ज्योती पवार यांच्या पथकाने त्या-त्या गावांमध्ये भेटी देऊन ग्रामस्थांना सुरक्षिततेचे संदर्भात मार्गदर्शन केले. सुदैवाने भूकंपामुळे कुठे नुकसान झालेले नसले तरीही ग्रामस्थांमध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


या भागात जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के

कळमनुरी तालुक्यातील सोडेगाव, निमटोक, टव्हा, सापळी, भुरक्याची वाडी, पोतरा यासह अनेक गावे तर वसमत तालुक्यातील कुरुंदा, वापटी, शिर्डी, पांगरा या गावांमध्ये आणि औंढा नागनाथ तालुक्यातील काही गावात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मिळाली आहे. अजूनही या गावातून माहिती घेण्यात येत असल्याचे आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी रोहित कंजे यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details