महाराष्ट्र

maharashtra

धक्कादायक; उच्चशिक्षित मुलाने आई-वडिलांना सोडले वाऱ्यावर, अन्. . .

उच्चशिक्षित मुलाने आई-वडिलांना वाऱ्यावर सोडल्याने आई-वडील खंगत गेले. वडिलांची प्रकृती ढासळल्यानंतर त्यांच्या औषधोपचाराचा खर्चही मुलगा करत नव्हता.

By

Published : May 24, 2019, 1:05 PM IST

Published : May 24, 2019, 1:05 PM IST

Updated : May 24, 2019, 2:02 PM IST

उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे यांचे कार्यालय

हिंगोली- तळहाताच्या फोडाप्रमाणे जपत लहानाचं मोठं करून मुलाच्या पंखांना बळ दिलं... उपाशी राहून त्याचं शिक्षणही पूर्ण केलं... पण विवाहानंतर उच्चशिक्षित मुलानं आई-वडिलांना वाऱ्यावर सोडून संसार थाटला... मात्र, या वृद्ध आई-वडिलांनी न्यायालयाची पायरी चढताच उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे यांनी त्यांना न्याय देऊन, त्यांची म्हातारपणाची काठी परत मिळून दिली आहे.

उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे यांचे कार्यालय


हिंगोली जिल्ह्यातील आडगाव येथील यशवंत शिवाजी खडसे यांचा संजय नावाचा मुलगा अमरावती येथे नोकरीला आहे. त्याच्या पत्नीचेही एमबीएपर्यंत शिक्षण झाले आहे. संजय आपल्या आई-वडिलांकडे अजिबात लक्ष देत नव्हता. वडिलांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली होती, मात्र तरीही तो त्यांना औषधोपचारासाठीही पैसे पुरवत नव्हता. त्यामुळे वडील मोल मजुरी करून आपल्या औषधींचा खर्च भागवत होते. त्यामुळे वडील यशवंत हे खंगत चालले होते.


उच्चशिक्षित असलेला मुलगा लक्ष देत नसल्याने यशवंत यांनी ज्येष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधिकरणात अर्ज दाखल केला होता. त्यामध्ये मुलाचे एमबीए झाले असून सुनेचेदेखील एमबीए झाल्याचे अर्जात नमूद केले होते. मात्र मुलगा सांभाळ करत नव्हता. ही तक्रार प्राप्त होताच उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन सुनावणी ठेवली. सुनावणीदरम्यान, 16 फेब्रुवारीला 2019 ला मुलगा संजय खडसे यांनी सुनावणीची तारीख वाढवून पुन्हा संधी देण्याची विनंती केली. मात्र त्यानंतरही मुलगा संजय खडसे हा सुनावणीला हजर राहिला नाही.


यशवंत खडसे यांनी सुनावणीला हजर राहून निर्वाह भत्ता देण्याची मागणी केली. आई-वडील व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह कल्याण अधिनियम 2007 च्या कलम 5 द्वारे मिळालेल्या अधिकारानुसार, उपजिल्हाधिकारी चोरमारे यांनी या प्रकरणाचा निकाल देत, यशवंत खडसे यांना दरमहा साडेसात हजार रुपये प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेपर्यंत बँक खात्यात किंवा मनिऑर्डरद्वारे मुलगा संजयने द्यावेत, तसेच स्वच्छतागृह स्नानगृह सुसज्ज असलेली खोली आई-वडिलांसाठी करून द्यावी, असे आदेश दिले.


आदेशाचा अवमान केल्यास ज्येष्ठ नागरिक निर्वाह अधिनियम आणि फौजदारी प्रक्रिया संहिता 1975 चे कलम 125 (3) अन्वये एक महिना कारावासाची शिक्षा देण्यात येईल, असेही आदेशीत केले आहे. या निकालामुळे वृद्ध दाम्पत्याने समाधान व्यक्त केले. या निर्णयामुळे आई-वडिलांना वाऱ्यावर सोडलेल्या मुलांना मात्र चपराक बसणार आहे, हे मात्र तेव्हढेच खरे.

Last Updated : May 24, 2019, 2:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details