हिंगोली- मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील काही सुशिक्षित तरुण शेतीला जोडव्यवसाय म्हणून मशरूमच्या शेतीकडे वळलेले आहेत. त्यानुसार मशरूम आता जिल्ह्यात चांगलेच प्रसिद्ध होत आहे. हे मशरूम आरोग्यासाठी गुणकारी असले तरीही पाहिजे तेवढी याची जनजागृती झालेली नाही. मात्र, ही शेती करणे म्हणजे समुद्रातून मोती काढल्यासारखेच असल्याचे कोळसा येथील लिमरा मशरूम उत्पादकांनी सांगितले. अनंत अडचणीचा सामना करत हे पीक घ्यावे लागते. नेमकं हे पीक घेताना कोणकोणत्या अडचणीला सामोरे जावे लागते, त्याचा 'ईटीव्ही भारत'च्या माध्यमातून घेतलेला हा आढावा...
हेही वाचा -#CAA Protest : वंचित बहुजन आघाडी करणार राज्यभर आंदोलनं, ४ जानेवारीपासून सुरूवात
हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावात मशरूमची शेती केली जाते. सेनगाव तालुक्यातील कोळसा येथील एमबीएचे शिक्षण पूर्ण करून नोकरीनिमित्त परराज्यात असलेल्या अकीब शेख यांनी आपले काका शेख मोबिन यांच्या मदतीने मशरूम शेती करण्यास सुरुवात केली. काकांचे शिक्षण हे केवळ दुसरीपर्यंत असले तरी अवजड कामे करण्यापेक्षा ही शेती करणे पुतण्याच्या मार्गदर्शनामुळे त्यांना अतिशय सोपे जात आहे. मात्र, मशरूमची शेती करत मशरूम ग्राहकांपर्यंत पोहोचवणे हे तर जिकरीचे आहेच. मात्र, त्याची निर्मिती करणे म्हणजे तारेवरची कसरत असून, समुद्रातून मोती शोधण्यासारखेच आहे. एका वर्षांत अनेक वाईट अनुभव आले. मात्र, तलाठी असलेल्या भावाने अन् त्याच्या मुलाने शेख मोबिन यांना वारंवार दिलेला दिलासा हा खूप काही सांगून जातो. ही शेती करत असताना आर्थिक बजेट हळूहळू वाढत जाते. परंतु, शेती सुरू करण्यासाठी जे अगोदर मार्गदर्शन केलं जातं ते नंतर होत नाही. बीज या शेतीसाठी अतिमहत्त्वाचे असतात. ते बीज बाहेर गावावरून मागवले जाते. ते वेळेवर येत नाही तर, कधी चुकीच्या पत्त्यावर जाते. यामध्ये बीज खराब होण्याचा देखील धोका असतो. भव्य असे शेड करून त्या बीजची प्रतिक्षा करावी लागते. बीज दाखल होताच त्याच्या प्रतीक्षेत असलेलं सोयाबीनचे कुटार त्याचे निर्जंतुकीकरण करून, त्यामध्ये ते टाकले जाते.